माजी खासदार राजू शेट्टी यांची टीका
प्रतिनिधी/ कराड
केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी वर्ग पिचून गेला आहे. त्यांच्या हक्काचे त्यांना देण्यात केंद्र व राज्यातील महाविकास आघाडी सरकार कमी पडले आहे. दोन्ही सरकारे शेतकरी हिताच्या बाबतीत आपले कर्तृत्व दाखवण्यात कमी पडली असून, हे अपयश झाकण्यासाठी जातीयवादाचा भडका तयार केला जात आहे, असा घणाघाती आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.
राजू शेट्टी शनिवारी कराड दौऱयावर होते. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मगाव देवराष्ट्रेपासून बळीराजा उद्धार यात्रा सुरू झाली आहे. 1 मे रोजी होणाऱया ग्रामसभेत शेतीला दिवसा दहा तास वीज मिळावी, शेतकऱयांना हमीभावाचा गॅरंटी कायदा केंद्र सरकारने मंजूर करावा हे दोन ठराव करण्यात येणार आहेत. या ठरावाद्वारे उच्च न्यायालयात आम्ही दाद मागणार आहोत. त्याचबरोबर ते ठराव सर्व संघटनांच्या वतीने मिळून आम्ही राष्ट्रपतींना देणार आहोत. त्यांना हमीभाव गॅरंटी कायदा करण्याच्या सूचना देण्याची विनंती करणार आहोत.
शेट्टी म्हणाले, वीज ही नैसर्गिकरित्या तयार होते. त्याच्यावर सर्वांचा समान अधिकार आहे. मात्र विजेचे वाटप होताना इतरांना 24 तास आणि शेतकऱयांना आठ तास असे होते. त्यातून मूलभूत अधिकाराचे उल्लंघन होत आहे. 20 वर्षांत जंगली जनावरे, सर्पदंश, महावितरणच्या शॉकमध्ये किती शेतकऱयांचा मृत्यू झाला याची माहिती जमा करत आहोत. ते आकडे आल्यावर संबंधित लोकांच्या मृत्यूला सरकार जबाबदार आहे, हे आम्ही न्यायालयासमोर मांडणार आहोत. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास 14 लाख दिले जातात. मात्र सर्पदंशाने मृत्यू झाला तर दोन लाख दिले जातात. त्याच सापाला मारताना पुरावा सापडला तर त्या शेतकऱयावर वन्यजीव प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला जातो. हा सरकारचा दुटप्पीपणा आहे. ऊस हे एकमेव पीक सोडले तर इतर पिकांना हमीभावाचे संरक्षणच नाही. त्यामुळे शेतकऱयांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. राज्यातील अतिरिक्त ऊस हा अचानक उभा राहिलेला नाही. वर्षापूर्वीच सरकारला राज्यात 190 कारखाने सुरू आहेत. त्याची गाळपक्षमता किती आहे, ऊस जास्त आहे हे माहिती होते. ऊस उभा आहे, त्याची जबाबदारी राज्य सरकारचीच आहे. उसाची वर्गवारी वयाप्रमाणे केली जात नाही. ओला चारा मिळतो म्हणून कमी वयाचा ऊस तोडला जातो. साखर आयुक्तांनी 18, 17, 16, 15 महिने वयाचा ऊस अगोदर गाळून त्यानंतर नवीन उसाचे गाळप केले पाहिजे. तरच अतिरिक्त उसाच्या गाळपाचा प्रश्न सुटेल.
राजू शेट्टी म्हणाले, शरद पवार यांना गेल्या अनेक वर्षांपासून मी ओळखतो. त्यांचे राजकारणही बघतो. भले त्यांचे आमचे वैचारिक मतभेद आहेत. मात्र एवढय़ा दीर्घ काळात त्यांनी कधीही जातीयवादी भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे ते जातीवादी नाहीत. राज्यातील महाविकास आघाडीबरोबर असलले मतभेद तसेच ठेवून किमान समान कार्यक्रमावर आम्ही एकत्र आलो होतो. मात्र ज्या शेतकरी हिताला आमचे प्राधान्य होते, त्याला महाविकास आघाडी सरकारने केराची टोपली दाखवली. त्यामुळे मी त्यांच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.