पोखरणाऱ्या अळ्यांमुळे पिके धोक्यात, नियंत्रणासाठी शेतकऱ्यांची धावपळ : कीटकनाशक पुरवण्याची मागणी
वार्ताहर/काकती
भुतरामहट्टी, हळ्ळेहोसूर, ईरणभावी, गंगेनळ, शिवापूर, मण्णिकेरी आदी भागात सोयाबिनचे पीक, पाने व शेंगा खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला असल्याने पिके धोक्यात आली आहेत. सध्याच्या परिस्थितीत किडीच्या अळ्यांनी आर्थिक नुकसान पातळी गाठलेली नसली तरी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. पुढील पंधरवड्यात सोयाबिनचे पीक हातचे वाया जावू शकते. काकती रयत संपर्क केंद्रातून सवलतीत कीटकनाशक औषध पुरवठा शेतकरी बांधवांना करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
ऑगस्ट महिन्यात संततधार झालेल्या पावसाने जमिनीत अधिक दलदल होवून काही सखल भागात पीक कुजून खराब झाल्याने विरळ झाली आहेत. गेल्या वीस दिवसांत ढगाळ वातावरण आणि संततधार पडणारा पाऊस अशा वातावरणात पाने व शेंगा खाणाऱ्या अळ्यांचे प्रमाण वाढल्याने कीड धरायला अनुकूल वातावरण मिळाले आहे. किडीच्या अळ्यांचे प्रमाण वाढल्याने पानांच्या जाळ्या व पाने मुरठून पिवळी पडत आहेत. ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी कीटकनाशकाच्या फवारणीवर भर दिला आहे. परिणामी शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकांच्या निगराणीवर भर दिला आहे.