प्रतिनिधी /बेळगाव
सदाशिवनगर शेवटचा बसस्टॉप परिसरात विविध समस्या निर्माण झाल्या असून गटारीचे बांधकाम, स्वच्छता आणि सीडी कोसळली आहे. याबाबत महापालिकेकडे तक्रार करूनही याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे कोसळलेल्या सीडीमध्ये वाहने अडकून अपघात होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी अनर्थ घडल्यानंतरच मनपाचे अधिकारी लक्ष देणार का? अशी विचारणा नागरिक करीत आहेत.
शहरात विविध विकामकामे राबवून स्मार्ट सिटी बनाविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या अंतर्गत काही मोजक्याच परिसरात स्वच्छता मोहीम तसेच विकासकामे राबविली जात आहेत. सदाशिवनगर शेवटचा बसस्टॉप परिसरात निर्माण झालेल्या समस्यांचे निवारण करण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या परिसरातील गटारी कोसळल्या असून ठिकठिकाणी सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. काही ठिकाणी सांडपाणी साचून रहात असल्याने रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या समस्या सोडविण्यासाठी महापालिकेला निवेदन देण्यात आले होते. पण याबाबत कोणतीच कारवाई झाली नाही. आता येथील गटारीवरील सीडीदेखील पूर्णपणे खराब झाली आहे. सीडीला मोठे भगदाड पडले असून वाहनधारकांना ये-जा करण्यास अडचण भासत आहे. त्यामुळे काही वेळा वाहनधारक अडकून पडत आहेत. या ठिकाणी मोठा अनर्थ घडण्यापूर्वी सीडीच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे..