खानापुरातील सर्वधर्मीय बैठकीत तहसीलदारांचे आवाहन
प्रतिनिधी / खानापूर
यावर्षी शिवजयंती, बसव जयंती, रमजान ईद तसेच येथील मिलाग्रीज चर्च यात्रा 2 ते 4 मे या दरम्यान होत आहेत. हे सर्व उत्सव नियमांचे पालन करून अत्यंत शांततेने साजरे करावेत, असे आवाहन तहसीलदार प्रवीण जैन यांनी येथे तालुका पंचायतीच्या सभागृहात बोलावलेल्या शांतता समितीच्या बैठकीत केले.
ते म्हणाले, देशातील काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोना संसर्ग सुरू झाला आहे. यामुळे आता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यात पुन्हा एकदा मास्कची सक्ती करण्यात आली आहे. यामुळे सर्वांनी मास्कचा वापर करावा. यासंदर्भात येत्या दोन-तीन दिवसात राज्य सरकारकडून आणखी काही नियमावली आल्यास त्याचेही पालन करणे बंधनकारक राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे म्हणाले, सर्व उत्सव साजरे करताना प्रत्येकाने आदराची भावना ठेऊन त्यामध्ये सहभाग घ्यावा. शिवजयंती, बसव जयंतीच्या मिरवणुका वेळेत सुरू कराव्यात, तसेच रमजान ईद अत्यंत शांततेने साजरी करावी. सर्वांनी नियमांचे पालन करावे, एकमेकांच्या भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घेऊन सर्व उत्सव उत्साहात साजरे करा, अशी त्यांनी विनंती केली.
यावेळी लायकअल्ली बिच्चण्णावर यांनी रमजान ईद, संजय कुबल, पंडित ओगले यांनी शिवजयंती तसेच रवि काडगी यांनी बसव जयंती साजरी करण्याबाबत माहिती दिली. बैठकीला नगराध्यक्ष मजहर खानापुरी, स्थायी कमिटी अध्यक्ष प्रकाश बैलुरकर, नगरसेवक रफिक वारीमणी, क्षेत्रशिक्षणाधिकारी लक्ष्मण यकुंडी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय नांद्रे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे साहाय्यक कार्यकारी अभियंता बसवराज हलगी, सामाजिक कार्यकर्ते एन. सी. तळवार तसेच उत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.