ऑनलाईन टीम/तरुण भारत
नुपूर शर्मा (nupur sharma) आणि नवीन कुमार जिंदाल (navin jindal) यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी यांच्याविरोधात जगभरातून रोष वाढतोय. या दोघांच्या अटकेच्या मागणीसाठी राज्यात आज ठिकठिकाणी मुस्लीम समाजाने तीव्र आंदोलन केली. सोलापूर, औरंगाबाद, जालना, अहमदनगरमध्ये भव्य मोर्चा काढत नुपूर शर्मा, जिंदाल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip Walse Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र सरकारने नुपूर शर्मा, जिंदाल यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांची दखल घेतल कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी वळसे पाटील म्हणाले की, “आपल्या सर्वोच्च श्रद्धास्थानाबद्दल जर कोणी अशी वक्तव्य करत असतील तर ते चुकीचे आहे. अशा प्रकारचे चुकीचे उद्गार कोण काढत असेल तर त्याचा राग येणे स्वाभाविक आहे. पण यानिमित्ताने एवढचं सांगत की, ज्या नुपूर शर्मांनी अशाप्रकारे चुकीचे उद्गार काढले किंवा नवीनकुमार जिंदाल यांनी जे उद्गार काढले त्याप्रकरणी महाराष्ट्रातही त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाल्या आहेत. पोलीस त्याची पूर्ण दखल घेतलीचं परंतु केंद्र सरकारने याची दखल घेत कडक कारवाई केली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
“महाराष्ट्रात नुपूर शर्मा आणि जिंदाल यांचा निषेध करण्यासाठी आज आंदोलन होणार असल्याची माहिती गुरुवारीच महाराष्ट्र पोलिसांना मिळाली होती. त्या दृष्टीकोणातून राज्यातील सर्व पोलीस युनिट्सला यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच बंदोबस्ताच्या दृष्टीने तयारीही करण्यास सांगितली होती. आज हा प्रकार जेव्हा घडला तेव्हा त्याचा आढावा घेतला. सोलापूर, औरंगाबाद, जालना आणि महाराष्ट्रातील काही भागातील मुस्लिम समाजातील बांधवांनी शांततेच्या मार्गाने हे आंदोलन केलं आहे,” अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे.
“महाराष्ट्रातील सर्व जनतेला मी धन्यवाद देईन की आपण शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं आहे, कमिश्नर, कलेक्टर, तहसीलदार यांनी भेटून आपलं निवेदन दिलं आहे. पोलिसांनी चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळली आहे आणि मुस्लीम समाजानेही मदत केली आहे. कुठल्याही प्रकारचा कटू प्रसंग घडलेला नाही,” अस देखील गृहमंत्री म्हणाले.