पुणे / प्रतिनिधी :
सीमाप्रश्नी केंद्र दुटप्पी राजकारण खेळत आहे. एका बाजूला महाराष्ट्रातील शहरे व गावांच्या समावेशावरून कर्नाटकातील जनतेची मते मिळवायची, तर दुसऱ्या बाजूला बेळगाव तुम्हाला देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत महाराष्ट्रातील जनतेला आश्वस्त करायचे, अशी ही दुहेरी नीती असल्याची टीका विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केली.
महाराष्ट्रातील कन्नड भाषा बोलणाऱ्या अक्कलकोट, सोलापूर या शहरांसह राज्यातील गावांचा समावेश कर्नाटकमध्ये करण्याची मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली आहे. या त्यांच्या विधानाचा मी निषेध व्यक्त करते, असे सांगून डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, महाराष्ट्रात अक्कलकोट, सोलापूरसारख्या शहरांमध्ये गेल्या शेकडो वर्षांपासून कानडी भाषिक, स्थलांतरीत नागरिक राहत आहेत आणि आता हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग बनला आहे. न्यायालयात या प्रश्नावर सुरू असलेली चौकशी आता ऐरणीवर आली असताना स्वत:कडील लंगडी बाजू लपविण्यासाठी कर्नाटकने अशा प्रकारे विधाने करण्यास सुरुवात केली आहे. समाजात तेढ वाढवण्याचा त्यांचा मनसुबा आहे. तर जनतेची दिशाभूल करणे, ही केंद्र सरकारच्या कामाची पद्धत आहे. या मुद्दय़ावरही हीच नीती अवलंबली जात आहे.
अधिक वाचा : शिरूर लोकसभेची जागा भाजपा लढविणार
या प्रश्नावर केंद्र सरकार दोन्ही हातात लोण्याचा गोळा ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. एका बाजूला कर्नाटक सरकारमधील जनतेची मते मिळवायची आणि दुसरीकडे महाराष्ट्रातील जनतेलादेखील बेळगाव तुम्हाला देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे सांगून काहीतरी आश्वासने द्यायची, अशी केंद्राची नीती आहे. मात्र, आता हे चालणार नाही. केंद्राने वेळीच कर्नाटकला चाप लावण्यासाठी पावले उचलण्याची तयारी दाखवावी. तसे होणार नसेल, तर महाराष्ट्रदेखील याबाबत प्रत्युत्तर देण्यास समर्थ असल्याचा इशारा डॉ. गोऱ्हे यांनी दिला.