…अन्यथा ऊस उत्पादक शेतकरी गप्प बसणार नाही; राजू शेट्टी यांचा इशारा
Raju Shetti : केंद्र सरकारने कोटा पद्धतीने साखर निर्यातिचा निर्णय घेतला यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे आक्रमक झाले आहेत. केंद्राने कोटा जाहीर करताना साखर उद्योगात असणारे भारतीय जनता पक्षाचे नेते काय करत आहे असा सवाल त्यांनी केला आहे. नेत्यांनी तोंडाला लावलेले कुलूप उघडावे अन्यथा ऊस उत्पादक शेतकरी गप्प बसणार नाही असा इशारा आज त्यांनी दिला.
राजू शेट्टी म्हणाले, साखर उद्योग हा महाराष्ट्रातील प्रमुख उद्योग आहे. ज्याच्यावर महाराष्ट्रातील अर्थकारण अवलंबून आहे. कोटयावधी ऊस उत्पादकांचं अर्थकारण अवलंबून आहे. हजारो कामगारांचे, नऊ लाख ऊस तोडणी कामगार, हजारो वाहकांचं भवितव्य यावर अवलंबून आहे. यावर परिणाम करणारा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला आहे. साखर निर्णातीला कोटा पध्दतीने ५० टन मर्यादा घातली. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला चालले आहेत. महाराष्ट्रातील साखर उद्योगांचा तोटा करून केवळ उत्तर प्रदेशातील साखर उद्योगाला फायदा व्हावा यासाठी केंद्राने निर्णय घेतला आहे. साखर उद्योगात असणारे भारतीय जनता पक्षाचे नेते काय करत आहे असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे. त्यांनी तोंडाला लावलेले कुलूप उघडावं अन्यथा महाराष्ट्रातील शेतकरी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला.