केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा पुढाकार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत गुरुवारी केंद्र सरकार आणि उल्फा संघटना यांच्यात शांतता करारावर स्वाक्षरी करण्यात आली. भारत सरकारच्या ईशान्येतील शांतता प्रयत्नांच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे. या शांतता करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे उल्फा या सशस्त्र संघटनेचे हजारो पॅडर आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात सामील होणार आहेत. उल्फा गेल्या अनेक वर्षांपासून ईशान्येकडील सशस्त्र सुरक्षा दलांविऊद्ध हिंसक संघर्ष करत आहे. हा हिंसाचार रोखण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने शांततेसाठी वेगवेगळे मार्ग निवडले जात आहेत. त्यानुसार महत्त्वाचा शांतता करार पूर्णत्त्वास आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत 29 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता नॉर्थ ब्लॉक, नवी दिल्ली येथे या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी, भारत सरकार, आसाम सरकार आणि युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसामच्या (युएलएफए) प्रतिनिधींमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. केंद्र सरकार गेल्या एक वर्षापासून या शांतता करारावर काम करत होते. आणि अनुप चेतियासह ‘युएलएफए’चे बडे नेते केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाटाघाटी करत होते. गृहमंत्री अमित शाह यांच्या पुढाकाराने हा महत्त्वपूर्ण करार पूर्ण झाला आहे.