केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केले स्पष्ट
प्रतिनिधी / मडगाव
आयआयटी सांगेत व्हावी, यासाठी केंद्र सरकार तडजोड करणार असल्याचे स्पष्ट संकेत काल बुधवारी केंद्रीय आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिले. सांगेत सद्या आयआयटीसाठी जागा निश्चित करण्यात आलेली आहे. ती जागा अपुरी पडत असल्याने केंद्राने आयआयटीचा प्रस्ताव फेटाळला होता. मात्र, गोव्यात आयआयटी होणे आवश्यक असून त्यासाठी तडजोडही केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मडगावात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय राज्यमंत्री पुढे म्हणाले की, आयआयटीमुळे उच्च शिक्षणाचे दरवाजे विद्यार्थ्यांसाठी खुले होतील. आज माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात देश आघाडीवर आहे. भविष्याचा विचार करता आयआयटी खुपच महत्वाची असल्याने गोव्यात आयआयटी व्हायला पाहिजे, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.
‘व्हर्टिकल’ उभारणी करणेही शक्य
सांगेत निश्चित करण्यात आलेली जागा अपुरी पडत असल्यास आयआयटीचा प्रकल्प ‘उभ्या’ (व्हर्टिकल) पद्धतीने उभारणे शक्य आहे आणि तसा विचार केला जाऊ शकतो. त्याचबरोबर पर्यावरणाची हानी होणार नाही याची देखील दखल घेतली जाईल. त्यासाठी तडजोड करणे शक्य आहे. पण, गोव्यात आयआयटी प्रकल्प होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले.
सांगेत आयआयटीला काही घटकांकडून विरोध होत आहे. याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, राज्यमंत्री चंद्रशेखर म्हणाले की, या ठिकाणी लोकशाही आहे. त्यामुळे विरोध व समर्थन दोन्ही गोष्टी होणारच आहे. पण, आयआयटीचा विचार करताना हा शैक्षणिक प्रकल्प असून त्यात गोव्याचे हित असल्याने तो साकारला जाईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.