फेब्रुवारीत परीक्षा : शिक्षण खात्याचा निर्णय
प्रतिनिधी /बेळगाव
शिक्षण विभागातर्फे 15 हजार पदांसाठी सीईटी परीक्षा घेण्यात आली. ही भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर उर्वरित जागांसाठी फेब्रुवारी 2023 मध्ये पुन्हा सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. यामुळे जे विद्यार्थी अत्यंत कमी गुणांनी सीईटी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, त्यांना शिक्षक भरतीसाठी आणखी एक संधी उपलब्ध होणार आहे.
15 हजार पदांसाठी 54 हजार 342 विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा दिली. जरी सीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या अधिक असली तरी सरकारी नियमावली, जिल्हानिहाय राखीवता, जातीय आरक्षण या सर्वांमुळे 15 हजारपैकी 3 हजार पदे रिक्त राहण्याची शक्मयता आहे. त्यामुळे या जागा भरून घेण्यासाठी पुन्हा सीईटी परीक्षा घ्यावी लागणार आहे. मागील वेळेला 10 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यापैकी 3 हजार पदे रिक्त राहिली होती.
त्यामुळे यावेळीही अशीच पदे रिक्त राहणार असल्याने शिक्षण विभागाने पुन्हा सीईटी घेण्याचा निर्णय घेतला आहे. एका वर्षात दोन वेळा शिक्षक भरतीसाठी सीईटी घेण्याचा पर्याय निवडला जात आहे. यामुळे जे परीक्षार्थी अत्यंत कमी गुणांनी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, त्यांना ही परीक्षा सोयीची ठरणार आहे.
टीईटीच्या धर्तीवर सीईटी…
राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षक भरती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिक्षक होण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होणे गरजेचे असते. यासाठी राज्य सरकारने वर्षातून 2 वेळा टीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर सीईटी परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.