पंतप्रधान मोदींचे ‘मन की बात’ मध्ये प्रतिपादन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
यावर्षी भारताला जी-20 या जगातील सर्वात बलाढय़ आर्थिक परिषदेचे अध्यक्षपद मिळणार आहे. ही भारतासाठी सुवर्णसंधी आहे. भारताने तिचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी आतापासूनच सज्जता केली पाहिजे. केंद्र सरकार त्यादृष्टीने सर्व प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात केले. याचे प्रसारण रविवारी आकाशवाणीवरुन करण्यात आले.
1 डिसेंबर 2022 या दिवशी अधिकृतरित्या भारत इंडोनेशियाकडून जी-20 परिषदेचे अध्यक्षस्थान आपल्या हाती घेणार आहे. जगासमोर आज अनेक आव्हाने उभी आहेत. अशा परिस्थितीत भारताने जगाच्या भल्यासाठी कार्य करण्याचा निर्धार केला आहे. यात आपल्या देशाचाही मोठा लाभ होणार आहे. जगासमोरील आव्हाने परतवून लावण्यासाठी भारताकडे अनेक उपाय आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले.
भारतासाठी संधी
जी-20 चे अध्यक्षपद ही भारतासाठी मोठी संधी आहे. भारताने या संधीचे सोने करण्याची आवश्यकता आहे. यासाठी जगाच्या हिताची भूमिका घेण्याचीही आवश्यकता आहे. काळ शांततेचा असो, भाषा ऐक्याची असो, किंवा कोणतीही परिस्थिती असो, आज पर्यावरण संरक्षणाचा प्रश्न सर्वात महत्वाचा ठरत आहे. पर्यावरणाची हानी कशी रोखायची आणि स्थायी विकास कसा साधायचा या प्रश्नाचे उत्तर आपल्याला भारताच्या संस्कृतीतच आढळले अशा अर्थाचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या देशाला उद्देशून केलेल्या संदेशात केले.
इतर मुद्दय़ांचाही उल्लेख
मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी इतरही अनेक मुद्दय़ांचा उल्लेख केला. त्यात भारतीय शास्त्रीय संगीताचा मुद्दा प्रमुख होता. भारताच्या संगीताने जगाला प्रभावित केले आहे. भारतात संगीताच्या साधनांचे आणि वाद्यांचेही उत्पादन मोठय़ा प्रमाणात होते. ही वाद्ये आता अन्य देशांमध्ये निर्यात होत आहेत. जगाच्या प्रत्येक देशात भारतीय स्थायिक झाले आहेत. तेथे त्यांनी भारतीय संगीतचा प्रसार केला असून स्थानिक जनतेलाही आता हे संगीत आवडू लागले आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. राजकीय मुद्दय़ांना मात्र त्यांनी स्पर्ष करणे टाळले.