मूळ शिवसेना पक्षातून बाजूला होत 39 आमदारांनी वेगळा गट बनवला. पुढे विधी मंडळात हा गट आणि भाजपा यांनी नव्या सरकारचे बहुमत सिध्द केले. पुढच्या काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अपेक्षित आहे. यावेळी काही जुने आणि अनेक नवे चेहरे मंत्री म्हणून लोकांच्या समोर येणे अपेक्षित आहे.
शिवसेना या पक्षसंघटनेने मुंबईत मराठी माणसाला आश्वासक वातावरण निर्माण करुन दिले. शिवसेनेच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून कोकणातील माणसांनी चांगली साथ दिली. दत्ताजी साळवी असोत किंवा वामनराव महाडिक असोत असे कितीतरी दिग्गज शिवसेनेत चांगले कार्यकर्ते बनले. कोकणी माणसांच्या आधारावर शिवसेनेचा विस्तार मुंबईत चांगल्याप्रकारे झाला. शिवसेनेने यापूर्वी दिलेले दोन्ही मुख्यमंत्री कोकणपूत्र होते हे विशेष. लोकाधिकार समिती असो अथवा विविध कारखान्यांमध्ये असलेल्या कामगार सेना संघटना असोत तेथे कोकणी लोकांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला चांगलेच हातपाय पसरता आले ही लक्षात घेण्याजोगी बाब आहे.
अगदी 1989 पासून पुढे शिवसेनेला कोकणात अनेक ठिकाणी यश मिळत गेले. अनंत गीते यांच्याकडून खासदारकीच्या निवडणुकीत गोविंदराव निकम यांचा पराभव झाला. यानंतर निकम यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, जोवर मुंबईत शिवसेनेचे प्राबल्य आहेत तोवर कोकणात शिवसेनेला पायबंद घालणे कठीण आहे. कोकण आणि मुंबईचे नाते लक्षात घेता निकम यांचे म्हणणे काळाच्या ओघात खरे ठरले.
सध्या शिवसेना विधीमंडळ पक्षात फुट पडली आहे. दोन तृतीयांशहून अधिक आमदार मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे आहेत. बंडखोर लोक फुटीर असून त्यांना मूळ पक्षसंघटनेत जागा नाही असे संघटनेतील पदाधिकारी म्हणत आहेत. कोकणातील सावंतवाडी येथे शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयावर शिवसैनिकांनीच दगडफेक केली. राज्यातील अन्य ठिकाणांसह कोकणात कमी अधिक प्रमाणात फुटीर विरुध्द मूळ शिवसेना यांच्या संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी रत्नागिरीत एका ज्येष्ठ शिवसैनिकाला दोन तडाखे देण्याचा प्रकार समोर आला आहे. हे तडाखे दुसऱया पक्षातल्या कुणी नव्हे तर बंडखोर समर्थक तरुणाने दिल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवसेना पक्षसंघटना दुहीच्या उंबरठय़ावर उभी आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसह अगदी ठाणे, पालघरपर्यंत सर्वच ठिकाणी दुफळीचे चित्र उभे राहिले आहे. 10 जुलैला शिवसेनेने रत्नागिरीत मेळावा आयोजित केला आहे. या कार्यक्रमात आमदार राजन साळवी यांना शिवसेना उपनेते पदी नेमल्याबद्दल सत्कार करण्यात येणार आहे. या मेळाव्याला आपण शिवसैनिक या नात्याने उपस्थित राहू अशी मांडणी बंडखोर समर्थक माजी मंत्री उदय सामंत यांनी केली होती. त्याला शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. बंडखोरांनी शिवसेना पक्ष संघटनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची गरज नाही असे सांगितले आहे. यामुळे बंडखोरांच्या समर्थनाचा झेंडा उघडपणे खांद्यावर घेतलेल्या कोणालाही रत्नागिरीच्या शिवसेना मेळाव्यात पाऊल ठेवू दिले जाणार नाही हे निश्चित झाले आहे.
एका बाजूला बंडखोर समर्थकांच्या उपस्थितीत शिवसेनेचे कोणतेच कार्यक्रम होणार नाहीत असे शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. त्याचा लाभ बंडखोर घेण्याची शक्यता आहे. ज्यांनी अद्याप बंडखोर समर्थनाचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला नाही, अशा कार्यकर्त्यांना शिवसेना कार्यक्रमात उप†िस्थत रहावे असे सुचविण्यात येईल. शिवसेनेच्या कार्यक्रमात सहभागी होऊन देखील मनातून बंडखोर समर्थन अशी स्थिती राहण्याची शक्यता आहे. या लोकांना हुडकून काढणे शिवसेना नेतृत्वासाठी कसोटीची बाब ठरणार आहे.
येत्या काही दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होईल. त्यानंतर पालकमंत्री पदे जाहीर होतील. बंडखोर आमदारांपैकी अनेकांना मंत्री पदे मिळतील. हे लोक पुढे वेगवेगळ्या जिह्यांचे पालकमंत्रीदेखील होतील. अनेक लोकांची तसेच कार्यकर्त्यांची कामे शासकीय यंत्रणेत असतात. बंडखोर पालकमंत्र्यांकडे जाऊन कामे करवून घेण्याची इच्छा अनेक कार्यकर्त्यांना होणे साहजिक आहे. त्या आकर्षणापोटी अनेक शिवसैनिक पालकमंत्री दरबारात हजर होण्याची शक्यता आहे. काही कडवे शिवसैनिक छुपेपणे पालकमंत्र्यांशी संधान साधून आपली कामे करवून घेण्याची देखील शक्यता आहे. नव्याने नियुक्त होणाऱया पालकमंत्र्यांचे मुख्य काम शिवसेना संघटनेत एकनिष्ठ असणाऱया लोकांना आपल्या बाजूला वळवून घेण्याचे राहिल असे राजकीय निरीक्षक सांगत आहेत.
अशा पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष संघटनेचे काम करणे आणि संघटनेचे अस्तित्व †िटकवणे हे मोठे आव्हानाचे काम राहणार आहे. कोकणात सर्वत्र शिवसेना संघटनेचा बोलबाला आहे. अन्य पक्ष त्यापेक्षा कमी ताकदीचे आहेत. यामुळे कोकणात शिवसेनेला जास्त लक्षपूर्वक काम करावे लागणार आहे. पुढील काळात संघर्ष बंडखोर शिवसेना विरुध्द मूळ शिवसेना असाच राहणार आहे.
जिल्हा नियोजन मंडळाकडे मंजूर केलेली यापूर्वीची कामे स्थगित ठेवण्याचे आदेश निघाले आहेत. नव्या पालकमंत्र्यांना त्याचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. सत्तेचा बदललेला सारिपाट लक्षात घेऊन कामे रद्द करणे, नव्याने मंजूर करणे किंवा आहेत ती सुरु ठेवणे असे निर्णय घेतले जाणे अपेक्षित आहे. प्रतिस्पर्ध्यांची राजकीय केंडी व्हावी या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचा आक्षेप राजकीय वर्तुळात घेतला जात आहे.
सिंधुदुर्गातील दीपक केसरकरांना बंडखोर गटाने प्रवक्ते पद दिले आहे. ठाकरे सरकारमध्ये मिळालेले पॅबिनेटमंत्री पद सोडून उदय सामंत शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यांचे समर्थक मंत्रिमंडळ विस्तारावेळी मोठा निर्णय होईल अशी अपेक्षा बाळगून बसलेले आहेत. रायगड जिह्यात एखादे मंत्री पद मिळेल असे बंडखोर समर्थकांना वाटत आहे. या पार्श्वभूमीवर पुढील काळ हा शिवसेना संघटनेसाठी अधिक आव्हानाचा राहणार आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भूमिका देखील सिंधुदुर्ग जिह्यात महत्वाची ठरणार आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी त्यांनी आखलेल्या रणनितीला संभाव्य पालकमंत्र्यांनी सहकार्य करावे अशी त्यांची अपेक्षा राहणे हे राजकीय वर्तुळात नैसर्गिक मानले जात आहे.
सुकांत चक्रदेव