पंतप्रधान शेख हसीनांचे वक्तव्य ः तोडगा काढण्यास भारत करू शकतो मदत
वृत्तसंस्था / ढाका
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या आजपासून भारताच्या 4 दिवसीय दौऱयावर असणार आहेत. या दौऱयापूर्वी एका मुलाखतीत त्यांनी रोहिंग्या मुस्लिमांना स्वतःच्या देशासाठी आव्हान ठरविले आहे. रोहिंग्या मुस्लीम हे बांगलादेशसाठी अत्यंत मोठे ओझे असून या मुद्दय़ावर तोडगा काढण्यास भारत एक मोठी भूमिका बजावू शकतो असे उद्गार शेख हसीना यांनी काढले आहेत.
बांगलादेशात 1 लाखाहून अधिक रोहिंग्या मुस्लीम राहत आहेत. रोहिंग्या मुस्लीम आमच्यासाठी एक अत्यंत मोठे ओझे ठरले आहेत. भारत एक मोठा देश असल्याने त्यांना सामावून घेऊ शकतो. केवळ भारतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय समुदाय अन् शेजारी देशांसोबत आम्ही चर्चा करत आहोत. या देशांनी काही पावले उचलावीत जेणेकरून रोहिंग्य मुस्लीम स्वतःच्या मायदेशी (म्यानमार) परतू शकतील असे शेख हसीना म्हणाल्या.
रोहिंग्यांचा तस्करीत हात
रोहिंग्या मुस्लिमांना आम्ही मानवतेच्या आधारावर शरण दिला होता. आम्ही सर्व गरजेच्या गोष्टी उपलब्ध केल्या. कोरोना काळात रोहिंग्यांचेही लसीकरण केले. परंतु किती काळ ते आमच्या देशात राहणार? ते शिबिरांमध्ये राहत आहेत, यातील काही जण अमली पदार्थांची तस्करी, शस्त्रास्त्रs आणि महिलांच्या तस्करीत गुंतले आहेत. रोहिंग्या मुस्लीम जितक्या लवकर स्वतःच्या देशात परततील तितकेच चांगले ठरणार असल्याचे विधान शेख हसीना यांनी केले आहे.
श्रीलंकेसारखी स्थिती होणार नाही
चीन बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हद्वारे बांगलादेश अन् नेपाळ यासारख्या छोटय़ा देशांमध्ये स्वतःचा प्रभाव निर्माण करू पाहत आहे. गरीब देशांमध्ये चीन कर्जाच्या स्वरुपात मोठी गुंतवणुक करत आहे, परंतु त्यातून उत्पन्नप्राप्ती न झाल्यास हे गरीब देश चीनच्या कर्जाच्या भाराखाली दाबले जात आहेत. हेच श्रीलंकेत घडले आणि तो देश दिवाळखोर झाला. या मुद्दय़ावर बांगलादेशच्या पंतप्रधानांनी भूमिका मांडली आहे. आमची अर्थव्यवस्था अद्याप मजबूत आहे. कोरोनासंकट, रशिया-युक्रेन युद्धाचा प्रभाव झाला असला तरीही बांगलादेश नेहमीच वेळेत कर्ज फेडत राहिला आहे. आमचे कर्जाचे प्रमाण खूपच कमी आहे. तर आमचा विकास अत्यंत भक्कम असून सर्वकाही नियोजनानुसार घडत असल्याचा दावा हसीना यांनी केला आहे.
भारतासोबत घनिष्ठ मैत्री
भारत हा बांगलादेशचा सर्वकालीन मित्र आहे. भारताने व्हॅक्सी मैत्री कार्यक्रमाच्या अंतर्गत बांगलादेशला लसींचा पुरवठा केला. भारत आणि बांगलादेश यांच्यात मतभेद असू शकतात, परंतु या मतभेदांवर चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढला जावा असे त्यांनी म्हटले आहे. शेख हसीना यांनी संकटकाळात मदत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रशंसा केली आहे. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान बांगलादेशचे अनेक विद्यार्थी पूर्व युरोपमध्ये अडकून पडले होते. मोदींच्या पुढाकारामुळे त्यांना सुखरुप परत आणता आले. भारताने स्वतःच्या विद्यार्थ्यांसह अन्य देशांच्या विद्यार्थ्यांनाही वाचवून परत आणल्याचे उद्गार हसीना यांनी काढले आहेत.