वृत्तसंस्था / रायपूर
झारखंडमध्ये काँग्रेससह सत्तेवर असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षात फूट पडण्याची शक्यता आहे. या पक्षाचे एक ज्येष्ठ आणि प्रभावशाली आदीवासी नेते चंपाई सोरेन यांनी नवा पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याशी त्यांचे मतभेद झाल्याने त्यांनी पक्षाचा त्याग करण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. ते भारतीय जनता पक्षात जाणार असल्याचीही चर्चा होती. तथापि, आता त्यांनी नवा पक्ष काढणार असल्याची घोषणा केल्याने या चर्चेवर पडदा पडला असून त्यांचा पक्ष युती करुन निवडणूक लढविणार की, स्वतंत्ररित्या या प्रश्नावर नवी चर्चा होत आहे.
झारखंड राज्यात येत्या नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याआधी चंपाई सोरेन यांनी नव्या पक्षाच्या स्थापनेची घोषणा केल्याने राज्यातील राजकारण तापणार असे मानले जात आहे. काही मतदारसंघांमध्ये त्यांचा प्रभाव असल्याचे बोलले जाते. तसेच त्यांच्यासमवेत झारखंड मुक्ती मोर्चाचे पाच ते सहा आमदार असल्याचेही दिसून आले आहे. हे आमदार त्यांच्या नव्या पक्षात गेल्यास झारखंड मुक्ती मोर्चाची हानी होऊ शकते, असे मत व्यक्त होत आहे.
नाराजीचे कारण काय ?
चंपाई सोरेन हे पक्षनेतृत्वावर बऱ्याच काळापासून नाराज आहेत. हेमंत सोरेन यांना भ्रष्टाचार प्रकरणी अटक झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांच्यास्थानी चंपाई सोरेन मुख्यमंत्री झाले. तथापि, सहा महिन्यांच्या कालावधीनंतर हेमंत सोरेन यांची जामिनावर मुक्तता झाल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रिपद सोडण्याचा आदेश देण्यात आला. आपल्याला अपमानास्पद पद्धतीने मुख्यमंत्रिपदावरुन काढण्यात आले, अशी आक्षेप त्यांनी घेतला होता. त्यातून वाद निर्माण झाला.