चतुरंगच्या रंगसंमेलनात अभिनेते मनोज जोशी यांचा दिलखुलास संवाद
प्रतिनिधी /फोंडा
प्रजा, राज्यकर्ता व राज्यातील बाकी सर्व हे नितीवानच हवेत. समाजोन्मुख लोक व नितीमत्ता हे चाणक्यांचे मूलसूत्र होते. सुखाचे मूल्य हेच त्यांचे पहिले सूत्र आहे. विविध खंडांमध्ये विखुरलेल्या अखंड भारतवर्षाचे पहिले स्वप्न चाणक्यांनी पाहिले व तशी संकल्पना मांडली. चाणक्यांच्या रंगमंचीय सादरीकरणाचा शोध अगदी कॉलेज जीवनापासून सुरु झाला. त्यासाठी कौटिल्य अर्थशास्त्र, चाणक्यनिती शास्त्र, चाणक्यसूत्र या सर्व गंथांचा सखोल अभ्यास केला. चाणक्य हे एका अर्थाने ‘पॅशन’ म्हणून स्वीकारले व त्याचेच पुढे ‘मिशन’ बनले, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते मनोज जोशी यांनी केले.
फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिरमध्ये आयोजित केलेल्या चतुरंग प्रतिष्ठानच्या रंगसंमेलनाची सुरुवात अभिनेते मनोज जोशी यांच्या रंगतदार अशा खंडप्राय मुलाखतीने झाली. संवादक सचिन चाटे यांनी जोशी यांच्यातील कलाविष्काराचे विविध कंगोरे उलघडविताना त्यांच्या बहुचर्चित ‘चाणक्य’ या रंगमंचीय सादरीकरणापासून सुरुवात केली. बालपणातील किस्से, नाटकाविषयी लागलेले वेड व त्याला घरातून झालेला विरोध असे विविध जीवनानुभव अगदी मनमोकळेपणाने त्यांनी प्रेक्षकांना सांगितले.
कॉलेज जीवनापासूनच चाणक्यांचा शोध
आचार्य चाणक्यांनी आपल्या आयुष्याला कशी रुंजी घातली याविषयी सांगताना, त्याला आपल्या कुटुंबाची पार्श्वभूमी असल्याचे जोशी यांनी सांगितले. वेद शास्त्रसंपन्न व नारदीय कीर्तनकारांची परंपरा असलेल्या कुटुंबात आपला जन्म झाला. जोशी कुटुंब हे मूळ गुजरातमधील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरतेवरील स्वारीच्यावेळी तेथील बरीच व्यापारी व पुरोहित मंडळी महाराष्ट्रात आली. त्यात आपले कुटुंबही होते. वडील नारदीय कीर्तनकार असल्याने घरात धार्मिक वातावरण होतो. घरावर संस्कृतीचा पगडा असल्याने आपण संस्कृत विषय शिकू शकलो. किर्तनामुळे मराठी व संस्कृत भाषा पक्की झाली. मात्र कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर नाटकाची प्रचंड आवड निर्माण झाली. या काळात नाटय़स्पर्धांमुळे अभ्यास कमी व नाटकेच जास्त व्हायची. नाटकाच्या या वेडापोटी आपण व्यसनाधीन होणार, वाया जाणार याची आईला चिंता लागून राहिली होती.
एक पॅशन पुढे मिशन बनले
वयाच्या 19 व्या वर्षी 1986 साली आपण ‘चाणक्य’ नाटक करायचे ठरविले. त्यासाठी अनेक ग्रंथ धुंडाळून संहिता तयार केली. सन 1989 मध्ये नाटक लिहून पूर्ण झाले व अभियान नाटय़स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी रु. 15 हजारांचे प्रथम पारितोषिक मिळाले. या स्पर्धेत महाराष्ट्र व गुजरातमधून तब्बल 52 नाटय़संस्था सहभागी झाल्या होत्या. आज चाणक्याचा 1780 वा प्रयोग होत आहे. बुद्धिपूर्वक, इमानदारीने घेतलेली मेहनत कधीच वाया जात नाही हे आपल्याला चाणक्याने शिकवले. एक पॅशन म्हणून स्वीकारलेला हा रंगमंचीय आविष्कार आज मिशन बनून राहिले आहे.
कलाकार मरेपर्यंत शिकत असतो
अभिनयाविषयी बोलताना ‘लोणचं जसं मुरल्यानंतर अधिक चांगलं होतं’ तसेच अभिनयाचे असते. कलाकार हा मरेपर्यंत शिकत असतो. ती एक तपश्चर्याच असते. त्यामुळे चाणक्यचे एवढे प्रयोग होऊनही प्रत्येक नवीन प्रयोगाला आपण रिहल्सर केल्याशिवाय रंगमंचावर चढत नाही असे त्यांनी नमूद केले.
‘सरफरोश’ हा पहिला व्यावसायिक चित्रपट
चित्रपटाच्या प्रवासाविषयी सांगताना, ‘मुळात आपल्याला चित्रपटात यायचे नव्हते !’ त्यासाठी कधी स्ट्रगल असा केला नाही. मराठी मालिका केवळ कुटुंब चालवण्यासाठी व अर्थाजनाच्या हेतुने केल्या. पण त्या मनापासून केल्या. ‘रंगीला’ या चित्रपटात आपल्याला तिकिट ब्लॅक करणाऱया ‘पक्या’चा रोल मिळाला होता. मात्र आपण त्यामध्ये कुठेच फिट बसत नसल्याने त्यासाठी भाऊ राजेश याचे नाव सूचविले व तो अविस्मरणीय ठरला. व्यावसायिक दृष्टय़ा 1996 मध्ये आलेला ‘सरफरोश’ हा आपला पहिला चित्रपट होता. निर्माते जॉन मॅथ्यू माथर यांनी ‘गांधी विरुद्ध गांधी’ या नाटकातील आपली भुमिका पाहून अमिर खान सोबत सरफरोश’मध्ये पोलीस इन्स्पेक्टरचा छोटा रोल ऑफर केला व तो जमून गेला. त्यानंतर ‘देवदास’ व अन्य चित्रपटांबरोबरच ‘आभाळ माया’ ही मराठीतील लोकप्रिय मालिकाही केली. त्याकाळी दर दिवशी आपण चार चार शो करूनही दमायचो नाही. वयाच्या 32 व्या वर्षी अर्थाजनाचे भान आले व तिथून मालिका व चित्रपट हा प्रवास सुरु झाला.
विक्रम गोखलेंमुळे जीवनात पुन्हा सावरलो
सन 2001 साली आपण गंभीर आजारी पडलो. साधारण 19 दिवस हॉस्पिटलमध्ये मरणासन्न अवस्थेत होतो. अभिनेते विक्रम गोखले यांनी आपल्याला या आजारातून बाहेर पडण्यासाठी आत्मबळ दिले व पुढे आपण चित्रपटसृष्टीत आत्मविश्वासाने वावरू शकलो, हा भावनिक प्रसंग त्यांनी कथन केला. या कठिण काळात पत्नीने टय़ुशन घेऊन संसार चालविला, ही आठवणही त्यांनी सांगितली. साधारण दिड वर्षांनंतर या आजारातून सावरल्यानंतर 2003 मध्ये प्रियदर्शन यांचा ‘हंगामा’ हा चित्रपट मिळाला. त्यातील पोलीस इन्स्पेक्टरची विनोदी भुमिका जॉनी लिव्हर काही कारणास्तव करू शकले नाहीत. त्यामुळे आयत्यावेळी ती आपल्या वाटय़ाला आली व ‘हंगामा’नंतर आपण पुन्हा मागे पाहिले नाही. ‘फिर हेरा फेरी’मधील कचरा शेट या भुमिकेसह अनेक चित्रपटातील छोटय़ा मोठय़ा भुमिका लोकप्रिय ठरल्या.
हिंदी चित्रपटसृष्टीने नाविन्याकडे झेप घ्यावी
आजच्या हिंदी चित्रपट सृष्टीबद्दल बोलताना साठ वर्षांपूर्वींचे हिरो, सर्जनशिल कथानकांचा अभाव, आषय विषयातील तोच तो पणा यामुळे हिंदी चित्रपटांना एक प्रकारचा साचलेपणा आलेला आहे. या उलट दाणिक्षात्य चित्रपटांनी सतत नवनवीन विषय, कलाकार व तंत्रज्ञानाच्या जोरावर मोठी झेप घेतली आहे. आता हिंदी चित्रपटांना जुन्या काळाप्रमाणे सत्वशिल सिनेमे बनवावे लागतील. मराठी रंगभूमिबद्दल सांगताना लोकांना अधिक मनोरंजन व आनंद देणारी नाटके व कलाकार चालतील. मात्र एक खरे की रंगभूमी हे परफॉर्मिंग आर्ट आहे. ती जीवंत कला असून महाभारत कालापासून ती चालत आली आहे. मराठी रंगभूमिला एक इतिहास व परंपरा आहे. ती आपल्या संस्कृतीत भिनल्याने ही कला कायम जीवंत राहील, असे त्यांनी शेवटी नमूद केले.