पुणे / प्रतिनिधी :
गेल्या अडीच वर्षात तुमचे सरकार होते. पुण्यात भाजपाची सत्ता असली, तरी पालकमंत्री म्हणून तुम्ही कसा काटा लावला, हूक लावला, याची बरीच उदाहरणे आहेत. पालकमंत्री म्हणून तुम्ही महानगरपालिकेला आदेश देऊन कामे करून घ्यायला हवी होती. ती का करून घेतली नाही, असा सवाल भाजपाचे नेते व राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पुण्यातील पाणी तुंबण्याच्या मुद्दय़ावर बोलताना केला.
चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी मंगळवारी संवाद साधला. ते म्हणाले, अजित पवार हे अडीच वर्षे पुण्याचे पालकमंत्री होते. पुण्यामध्ये भाजपाची सत्ता असूनही त्यांनी पालिकेला कसे दमवले आहे, याची मोठी उदाहरणे आहेत. पालकमंत्र्यांना अधिकार असतात. मग तुम्ही गटार साफ करून घ्या, नाले साफ करून घ्या, अशा सूचना करून का नाही दमवले? पण, तसे तुम्ही केले नाहीत.
अधिक वाचा : PM मोदींवर आत्मघातकी हल्ल्याचा कट, अलर्ट जारी
आता तुम्ही पायउतार झाल्यानंतर याबाबत आरोप करत आहात. मी काही पाणी तुंबण्याचे समर्थन करत नाही. नागरिकांना जो त्रास झाला, त्याबद्दल मी संवेदनशील आहे. मी पुण्याचे सीपी आणि आयुक्तांना अशी विचारणा केली आहे, की वेळ पडली तर आपल्याला पुणे विद्यापिठातील एनएसएस युनिटची मदत घेता येईल का? मॅन पॉवरची सध्या गरज आहे. त्यावर सीपींनी काम सुरू असल्याचे सांगितले आहे. लोकांना जवळच्या ठिकाणी हलविण्याचे काम सुरू आहे, असेही पाटील यांनी म्हटले आहे.