ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिंदे गटातील 10-15 आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला होता. पण त्यांचे 10 की 15 हे अजून निश्चित नाही. आधी त्यांनी तो आकडा निश्चित करावा. उगाच फेकाफेकी करू नये. औरंगाबादला राहून खैरे ढगात गोळ्या मारतात आणि वातावरण भांबावून सोडतात, असा टोला शिंदे गटातील आमदार शहाजी बापू पाटील यांनी लगावला.
आज पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, खैरेंना काहीही माहित नसतं. ते राजकीय वर्तुळात चर्चा व्हावी, असे वक्तव्य करत असतात. औरंगाबादेत जाऊन ढगात गोळ्या मारतात. आम्हाला गद्दार तेच म्हणतात जे सकाळी मंत्रालयात जायचं म्हणून अंघोळीला गेले होते आणि बाहेर आल्यावर कळालं की आपलं मंत्रीपद गेलं.
अधिक वाचा : आसारामबापूंच्या ५ हजार भक्तांचा पुण्यात मूक मोर्चा
दसरा मेळाव्याबद्दल बोलताना ते म्हणाले, खरी शिवसेना आमची आहे. ती बाळासाहेबांच्या विचारावर चालणारी आहे. त्यामुळे दसरा मेळावा एकनाथ शिंदे यांनी घ्यावा अशीच आमची मागणी आहे. पण दसरा मेळावा अजून लांब आहे. मुख्यमंत्री त्याच्यावर निर्णय घेतील.
यावेळी त्यांनी उद्धव आणि आदित्य ठाकरेंवरही निशाणा साधला. मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सांगोल्यात दोन बंगले भाडय़ाने घेऊन देतो. त्यांनी माझ्यावर काय लक्ष ठेवायचं आहे ते ठेवावं आणि काय पाडायचं ते पाडावं. महाराष्ट्रात सगळय़ात जास्त वेळा पडायचा विक्रम माझ्या नावावर आहे.