ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन बोलताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली होती. यावरुन वादंग उठले होते. राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून संताप व्यक्त होत होता. त्यानंतर राज्य महिला आयोगाने यासंदर्भात पाटील यांना नोटीस पाठवली होती. अखेर या प्रकरणावर चंद्रकांत पाटील यांनी महिला आयोगाला पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, आयुष्याची 45 वर्षे सामाजिक, राजकीय जीवनात गेल्यानंतर स्वयंसिद्धा, हेल्पर्स ऑफ द हॅन्डिकॅप, सावली, आई, संवेदना व वात्सल्य सारख्या संस्थांच्या मागे उभे राहून महिला सबलीकरणासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणाऱ्या जगातील सर्वात मोठय़ा पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असणारा मी, ज्या पक्षाच्या महाराष्ट्र विधानसभेत 12 महिला आमदार व देशाच्या लोकसभेत महाराष्ट्रातून 5 महिला खासदार आहेत. मला सुप्रियाताईंबद्दल व महिलांबद्दल मनात अनादर नसताना ग्रामीण म्हणीचा वापर केल्यामुळे अपमानित व्हावे लागते, यासारखे आयुष्यात दु:ख नाही.
माझ्या ओबीसी बंधू-भगिनींना राजकीय आरक्षण न मिळाल्यामुळे मी त्रागाने केलेल्या उच्चारात सुप्रियाताई किंवा समस्त माता-भगिनींचा अपमान झाला असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
ओबीसी आरक्षणाबाबत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली होती. ते म्हणाले होते की, “कशाला राजकारणात राहता, घरी जा, स्वयंपाक करा. खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची. कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायचे, आता घरी जाण्याची वेळ झालीये. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या.” पाटील यांच्या या वक्तव्याने त्यांना चौफेर टीकेचा सामना करावा लागत होता.