ऑनलाईन टीम/तरुण भारत
लोकशाहीची जेवढी थट्टा करता येईल तेवढी मविआने केली आहे. मविआला ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही. येणाऱ्या निवडणूका ओबीसी शिवाय करायच्या आहेत. म्हणूनच कोरोनाचे कारण सांगून त्यांनी याआधीही निवडणूका पुढे ढकलल्या. एवढेच नव्हे तर प्रभागरचेनेत ही सगळा घोळच. मात्र प्रभागरचनेमधील बदलाशिवाय निवडणूका घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कोर्टाकडून दाद मागणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी दिली. आज कोल्हापुरात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मविआवर निशाणा साधला. मविआतील दुफळी, आमदारांची नाराजी याचा फायदा भाजपाला होणार असल्याचेही ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, विधानपरिषद बिनविरोध होण्याचा आमचा प्रयत्न होता. मात्र मविआने माघार घेतली नसल्याने २० तारखेला निवडणूक होईल. भाजपाला ही एक संधी आहे. आम्ही ५ उमेदवार उभे केले आहेत. ते ५ ही उमेदवार निवडून येतील आणि मविआचा नैतिक पराभव होणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. मविआतील दुफळी, आमदारांची नाराजी याचा फायदा भाजपाला विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी होणार असल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा- गांधी घराण्याची संपत्ती वाचवण्याचा वरिष्ठ नेत्यांचा प्रयत्न; स्मृती इराणींचा गंभीर आरोप
धनंजय महाडिकांच्या (Dhanjay Mahadik) निमित्ताने आम्हाला एक चांगले नेतृत्व मिळाले आहे. आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याला त्रास दिलेला आम्ही खपवून घेणार नाही. मविआकडे महाराष्ट्राची जरी सत्ता असली तरी धनंजय महाडिकांनी दर महिन्याला एक मंत्री कोल्हापुरात आणला पाहिजे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. एका बाजूला कार्यकर्त्यांच्या मागे उभे रहावे असेही ते म्हणाले. पश्चिम महाराष्ट्राचे चांगले नेतृत्व ते करतील असा विश्वास चंद्रकांतदादांनी व्यक्त केला. पुढे बोलताना ते म्हणाले, मविआ प्रचंड अरेरावी करत आहे. कार्यकर्त्यांना पोलिस स्टेशनला बोलवून त्रास देत आहे. कोल्हापूर उत्तरच्या निवडणूकीतही भाजपाकडे पैसे सापडल्याचा कांगावा केला. त्यांनी ‘हम करेसो कायदा’ हा फाॅर्म्यूला लागू केला. मात्र अशा वातावरणात देखील आम्ही राज्यसभेचे मैदान मारले आहे.
धनंजय महाडिक हे जरी खासदार झाले असले तरी त्यांची स्वत:ची एक ताकद आहे. त्यांना फक्त भाजपाची साथ मिळाली. कोल्हापुरातून चुरशीच्या निवडणूकीतून निवडून गेलेल ते पहिले खासदार आहेत. संभाजीराजे निवडून गेले ते राष्ट्रपती कोट्यांतून निवडून गेले होते. मात्र यावेळची निवडणूक ही अटी-तटीची निवडणूक होती. आम्ही शांत राहून मुंगीहून साखर खाल्ली आहे असेही ते म्हणाले.
हेही वाचा- तुम्ही काय पेरता हे लक्षात आलं पाहिजे; चंद्रकांतदादांचा शरद पवार यांच्यावर निशाणा
काम करुन दाखवणारा खासदार
मी फक्त बोलणारा खासदार नाही.तर काम करुन दाखवणारा खासदार आहे. कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्राचा विकास करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. भाजपाचा जो अजेंडा असेल शेतकरी वर्गासाठी, सर्वसामान्यांसाठी जे कायदे केले जातील ते कायदे पक्षाध्यक्षांच्या आदेशानुसार राज्यसभेत बनवण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे धनंजय महाडिक म्हणाले.