ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यात मविआ सरकार बरखास्त झालं आणि भाजपा- शिवसेना सरकार स्थापन झालं. विजयाचा जल्लोष साजरा करत नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान आज भाजपचे नेते राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) हे विधानसभेच्या अध्यक्षपदी निवडून आले. यामुळे भाजपला दुधात साखर पडल्याचा फिल येत असेल. मात्र ज्यांनी हे सगळं घडावं म्हणून मेहनत घेतली त्यांचा पत्ता कट झाला की काय़ असा सवाल उपस्थित केला. ”मी पुन्हा येईन” हे ब्रीद वाक्य घेऊन डंका पिटणारे देवेंद्र फडणवीस आणि त्यांना साथ देणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी भाजपा महाराष्ट्रात पुन्हा सत्तेत येण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. सेनेच्य़ा बंडखोर आमदारांनी बंड केल्यानंतर त्यांना आपल्याकडे वळवत भाजपाची ताकद वाढवण्याचे काम केलं. मात्र यातून चंद्रकांत दादांचाचं पत्ता कट करण्य़ात आला का? तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मिळावे असे स्वप्न पाहणाऱ्या फडणवीसांना (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्रीपद देवून धक्का देण्यात आला. यामुळे भाजपामध्ये काहीतरी गडबडं असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
दरम्यान आज अजित पवार यांनी विधानसभेत चंद्रकांत दादांवर निशाणा साधला. दादा बाकडं वाजवू नका, तुमचं मंत्रीपदचं येईल की नाही सांगता येत नाही, असा टोला त्यांनी लगावला. चंद्रकांत पाटील हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून गेली काही वर्ष काम पाहात आहेत. अशात चंद्रकांत पाटील यांनी राज्यात पक्षविस्तारासाठी काम करावं हीच अपेक्षा केंद्रीय नेतृत्व ठेवत असल्याचं पाहायला मिळतंय.फडणवीस यांना दिलेल्य़ा धक्यावरून चंद्रकांत पाटील हे मंत्रीपदाच्या रेसमध्ये नसतील हे जवळपास स्पष्ट झालं आहे.
हेही वाचा- शिवसेनेचे वकील ते ‘शिंदे’ सरकारचे विधानसभा अध्यक्ष, कोण आहेत नार्वेकर; जाणून घ्या एका क्लिकमध्ये
भाजपमध्ये पक्षाच्या आदेशाला महत्वाचं स्थान दिलं जातं. फडणवीसांनी मिळालेल्या आदेशाचे पालन ते करत आहेत. मात्र भाजपातील इतर अनेक नेत्यांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुजरात सारखा महाराष्ट्रात निर्णय होईल का असा प्रश्न या नेत्यांना पडला आहे. कारण शिंदे गटातील ५० आमदारांनी आता भाजप कोणते पद देणार?तसेच गेल्या पाच वर्षापासून पदाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या भाजप नेत्यांना कोणतं पद मिळणार याची चर्चा सध्या भाजपात होत आहे.