कोल्हापूर/प्रतिनिधी
ज्या राष्ट्रवादीचे २०१४ ला दोन आमदार होते, त्या राष्ट्रवादीचे २०१९ ला हसन मुश्रीफ व राजेश पाटील काठावर निवडून आले. समरजित घाटगे यांना ८८ हजार मते पडली. तिथे इतक्या लोकांना राष्ट्रवादी नको आहे. २०१४ साली कोल्हापुरातील राष्ट्रवादीच्या उमेदवाराला ८ हजार मते होती, तर भाजपला ४० हजार मते होती. मग कशाच्या जीवावर तुम्ही गमजा मारता! असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट शरद पवार यांना केला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा समाचार घेतला. वसंत व्याख्यानमालेत शरद पवार यांनी मी पुन्हा काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा तोंड काळे करून पुन्हा हिमालयात जाईन असे जाहीरपणे बोलले होते. मग जयंत पाटील आता तुम्ही पवार यांना घेऊन हिमालयात जाणार का? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.