ऑनलाईन टीम / मुंबई :
कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसच्या जयश्री जाधव (jayshree jadhav) यांनी जवळपास 19 हजार मतांनी विजय मिळवला आहे. जयश्री जाधव यांना 96 हजार 226 मतं मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम (satyajeet kadam) यांना 77 हजार 426 मतं मिळाली आहेत. सत्यजीत कदम यांच्या पराभवानंतर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra avhad)यांनी भाजपावर आणि चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्यावर मीम पोस्ट करत खोचक टोला लगावला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे आहेत. तरीही जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नाही. त्यामुळे या निवडणुकीसाठी चंद्रकांत पाटील कोल्हापुरात तळ ठोकून होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले होते की, आज चॅलेंज आहे आपलं. ज्याला वाटतं असेल त्यानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या विधानसभेच्या कोणत्याही मतदारसंघाचा राजीनामा द्यायचा. पोटनिवडणूक लावायची.. निवडून नाही आलो ना तर राजकारण सोडून हिमालयात निघून जाईन. आज कोल्हापुरात भाजपचा उमेदवार पराभूत झाल्याने चंद्रकात पाटील यांचे हिमालयातील मीम्स व्हायरल होत आहेत.
याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी दोन ट्विट केले आहेत. एका ट्विटमध्ये ”फुले, शाहू, आंबेडकर विचारांचा विजय… कोल्हापूरची जागा जिंकली… शाहू महाराज की जय”, असं म्हटलं आहे. तर दुसऱ्या ट्विटमध्ये खोकच मीम्स शेअर केलं आहे. त्यामध्ये चंद्रकांत पाटील मांडी घालून आणि डोळे मिटून बसल्याचं दिसत आहे. तो फोटो मॉर्फ करून पाठिमागे हिमालय पर्वत दाखविण्यात आला आहे. सोबत बॉक्समध्ये ‘मी पोहोचलो रे हिमालयात’ असं लिहिलं आहे. हे ट्वीट शेअर करताना जितेंद्र आव्हाडांनी “नको, परत या”, अशी खोचक टिप्पणाही केली आहे.