ऑनलाईन टीम / तरुण भारत :
केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिला अन् मनावर दगड ठेवून देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय मान्य केला. दुःख झालं पण रुसून न बसता आम्ही दुःख पचवून पुढे गेलो कारण राज्याचा गाडा पुढे हाकायचा होता, अशा शब्दात भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदावरुन नाराजी व्यक्त केली.
पनवेलमधल्या भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत पाटील बोलत होते. ते म्हणाले, केंद्रातील नेत्यांनी आदेश दिला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं. केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशाने सर्वांनाच दुःख झालं. पण अक्षरशः मनावर दगड ठेवून देवेंद्र फडणवीसांनी तो आदेश मान्य केला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. आपल्याला गाडा पुढे हाकायचा होता, त्यामुळे आपण हे दुःख पचवले.
पालिका निवडणूक लागली आहे. आपल्या मुंबई महापालिका जिंकायची आहे. आगामी काळात आपण खूप परिश्रम घेऊ. नेत्यांनी आदेश करायचा नसतो इच्छा व्यक्त करायची असते आणि आपण त्याच पालन करायचं असतं, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
हेही वाचा : राज्य सेवा परीक्षेचा नवा अभ्यासक्रम जाहीर