पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
ऑनलाईन टीम/तरुण भारत
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडी येथे झालेल्या शरद पवार आणि गोपीचंद पडळकर यांच्या राजकीय संघर्षाचा वाद वाढण्याची शक्यता आहे. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना चौंडीच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी रोखलं त्यानंतर पडळकर यांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला. त्यानंतर आता भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करण्याची मागणी केली आहे.
पडळकर (BJP Gopichand Padalkar) यांनी पत्रात म्हटलंय की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (ahilyadevi holkar) यांच्या जयंतीमध्ये पवार आजोबा-नातवाच्या मुघलशाहीने पोलीस बळाचा गैरवापर करत अहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे दर्शनापासून जाण्यास रोखलं. शेकडो हिंदूंनी जीव गमावलेल्या मुंबई बॉम्बब्लास्टचा सुत्रधार दाऊद इब्राहीमच्या बहिणीसोबत आर्थिक भागीदार असणाऱ्या नवाब मलिकांचे पालनकर्ते शरदचंद्र पवार यांना हिंदू राजमाता यांची जयंती म्हणजे नातवाला लाँच करण्याचा इव्हेंट वाटतो का? अशी टीका पडळकरांनी केली आहे.
हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संपूर्ण हिंदुस्थानाच्या प्रेरणास्थान आहेत. जेव्हा हिंदूस्थानात मुसलमानी राजवटीत हिंदु संस्कृती मंदिरे, लुटली आणि तोडली जात होती त्यावेळेस अहिल्यामातेने या हिंदुसंस्कृतीत प्राण फुंकले त्यांचा जीर्णोद्धार केला. हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म त्या जिल्ह्याचे अहमदनगर नाव बदलून अहिल्यानगर करण्यात यावे अशी अहिल्याप्रेमींची लोकभावना असल्याचं पडळकरांनी पत्रात म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांना उद्देशून बोलताना ते म्हणाले, आपण कोणत्या इतिहासाचा वारसा सांगणार आहात? मुघलशाही की होळकरशाहीचा? ‘अहिल्यानगर नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नसून स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध कराल ही अपेक्षा, अन्यथा हा बहुजन जागा झालाय आणि संघटीत झालाय, हे लक्षात ठेवा, असा इशाराही भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला.