परमपूज्य श्री शक्ती शांतानंद महर्षी यांचे आवाहन
प्रतिनिधी/ म्हापसा
देशात सर्वत्र कागदोपत्री रेकॉर्डवर भारताचे इंडिया असे नाव कोरले गेले आहे. ‘इंडिया’ आमची माता नसून ‘भारत’ ही आमची माता आहे. ते फक्त नाव नसून मंत्रही आहे. भारतमातेला आमच्या संस्कृतीत आणण्यासाठी ‘भारत माता की जय’ म्हणणे काळाची गरज आहे. आज आझादी का अमृत महोत्सवी वर्ष साजरे करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया नाव संपवून ‘भारत’ नावाचा जयजयकार करावा. आमचे भाग्य, भविष्य बदलण्यासाठी भारत नावाची घोषणा करावी, जेणेकरुन भारत देश विश्वगुरु बनण्यास उशीर लागणार नाही, असे प्रतिपादन या यात्रेचे नेतृत्व करणारे परमपूज्य श्री शक्ती शांतानंद महर्षी यांनी केले.
म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वर संस्थानच्या पटांगणात श्री रामराज्य दिग्विजय रथयात्रेचे आगमन झाल्यावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, उपसभापती जोशुआ डिसोझा, मंत्री नीळकंठ हळर्णकर, आमदार केदार नाईक, आमदार मायकल लोबो, डिलायला लोबो, माजी आमदार दयानंद सोपटे, नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर, विश्व हिंदू परिषदेचे मोहन आमशेकर, बोडगेश्वर संस्थान अध्यक्ष आनंद भाईडकर, उत्पल पर्रीकर तसेच उत्तर गोवा अध्यक्ष संजय वालावलकर, जिल्हा पंचायतसदस्य कार्तिक कुडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रथयात्रेचे स्वागत केले व श्रीरामाच्या पादुकांचे दर्शन घेतले.
प्रत्येक शैक्षणिक संस्थेत ‘रामायण’ विषय सक्तीचा करा
रामराज्यासाठी अगोदर त्याची स्थापना आवश्यक आहे. रामाविना, रामायणविना रामराज्य कसे बनू शकते. भावीपिढीला रामायणाची माहिती मिळावी यासाठी प्रत्येक शैक्षणिक संस्थेत रामायण विषय सक्तीचा करणे आवश्यक आहे. इतिहासाच्या पाठय़पुस्तकांमध्ये औरंगजेब, बाबर, अकबर अशांची आक्रमणे वाचायला मिळतात मात्र छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, सुभाषचंद्र बोस या महावीरांचा इतिहास त्यात नसतो. कुठल्याही संताचा इतिहास शिकविला जात नाही. मुख्यमंत्र्यांनीही या विषयाकडे लक्ष दिले पाहिजे. 2022 हे कृष्ण वर्ष आहे याची लोकांना माहिती नाही. कृष्णापूर्वी व नंतर याचा 500 वर्षांपूर्वीची माहिती, रामराज्याची माहिती जगाला झाली पाहिजे. यासाठी हे विषय शैक्षणिक संस्थेत आणणे अत्यावश्यक आहे, असे श्री शक्ती शांतानंद महर्षी म्हणाले.
कोणावरही अन्याय होणार नाही हे प्रभू रामचंद्रांचे अनुकरण मोदी करत आहेत ः मुख्यमंत्री डॉ. सावंत
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत स्वागतपर भाषणात म्हणाले की, आपल्याला प्रभू रामचंद्रांची पूजा करण्याचा मान मिळाला म्हणून तमाम गोमंतकीयांच्यावतीने आपण सर्वांचे आभार मानतो. ज्या अयोध्येत राम मंदिर बांधत त्या राममंदिराच्या जागेत पूजा करण्याचा योगही आपल्यास गेल्यावर्षी मिळाला. 2014 सालापासून रामराज्याची देशात सुरुवात झाली आहे. ‘सबका साथ सबका विकास’ यानुसार काम सुरु असून कुणावरही अन्याय होणार नाही मग तो कोणत्याही धर्माचा असो हे प्रभू रामचंद्रजींचे धोरण होते तेच धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे सुरु ठेवले आहे. देशात रामराज्य आणण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
म्हापसा येथे रामराज्य दिग्विजय यात्रेचे उत्तर गोवा अध्यक्ष संजय वालावलकर यांनी स्वागत केले तर उपाध्यक्ष विलास पिळर्णकर यांनी आभार मानले. यावेळी मोठय़ा संख्येने भक्तगण उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस अधीक्षक आशिष शिरोडकर व उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.