गेल्या आठवड्यात ब्रिटनच्या दौऱ्यावर असताना भारतातील लोकशाहीवर टिका केल्याने कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून संसदेत झालेल्या गदारोळामुऴे दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करण्यात आले. राहूल गांधींनी केलेल्या टिकेवर भाजप सदस्यांनी कॉंग्रेसने माफी मागावी अशी मागणी केली. भाजपच्या या मागणीवर काँग्रेसच्या सदस्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली, ज्यामुळे लोकसभा किंवा संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
आज सकाळी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा भागाची कार्यवाही सुरू होताच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गांधींच्या भारतीय लोकशाहीवरील केलेल्या टिप्पणीचा उल्लेख केला. तसेच राहूल गांधी यांनी भारताची “बदनामी” करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. पुढे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले, “सभागृहाने या वक्तव्याचा निषेध केला पाहिजे. या वक्तव्यामुळे राहूल गांधींनी माफी मागावी.”
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या वक्तव्याचा काँग्रेस सदस्यांनी जोरदार विरोध केला. कॉंग्रेस आणि भाजप सदस्यांच्या गदारोळामुळे कामकाज करणे जिकीरीचे ठरल्याने सभापतींनी कामकाज तहकूब केले. सभागृह तहकूब करण्यापूर्वी भारतातील लोकशाही अधिक मजबूत होत असल्याची टिप्पणीही सभापती ओम बिर्ला यांनी केली.