31 मार्चपर्यंत तयारी पूर्ण करण्याच्या सूचना
ऋषिकेश / वृत्तसंस्था
चारधाम यात्रेची तयारी सध्या युद्धपातळीवर सुरू झाली आहे. 22 एप्रिलला अक्षय्य तृतीयेपासून चारधाम यात्रा सुरू होईल. गंगोत्री-यमुनोत्री धामचे दरवाजे परंपरेने अक्षय्य तृतीयेच्या दिवशी उघडतात, तर श्री बद्रीनाथ धामचे दरवाजे 27 एप्रिलला आणि श्री हेमकुंड साहिबचे दरवाजे मे महिन्यात उघडले जाणार आहेत.
ऋषिकेश येथे महानगरपालिका सभागृहात बुधवारी झालेल्या पूर्वनियोजन बैठकीत विविध मुद्दय़ांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी चारधाम यात्रा प्रशासन समितीने सर्व विभागांना 31 मार्चपूर्वी तयारी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. चारधाम यात्रेची नोंदणी 20 फेब्रुवारीपासून सुरू होण्याची शक्मयता आहे. उत्तराखंड पर्यटन विभाग ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी काउंटर सुरू करणार आहे.
बैठकीत आयुक्त/अध्यक्ष यात्रा प्रशासन संघटनेने चारधाम यात्रेशी संबंधित सर्व विभागांना 31 मार्चपूर्वी तयारी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गेल्यावषी विक्रमी 46 लाख भाविक चारधामला पोहोचले होते. यंदाही कोरोना संसर्गाचे सावट नसल्यामुळे अधिक संख्येने यात्रेकरू येण्याची शक्मयता आहे. यात्रेकरूंचा प्रवास सुरळीत आणि सोपा करण्यासाठी यात्रेचे नियोजन करण्याची सुरुवात आतापासूनच सुरू आहे. भाविकांच्या सोयीसाठी ऑनलाईन-ऑफलाईन नोंदणीची यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.
चारधाम यात्रेदरम्यान वाहनांची संख्या, वाहतूक व्यवस्था निश्चित करण्यासाठी एसडीआरएफ, वाहतूक पोलीस यंत्रणा यासाठी नोडल अधिकारी तैनात केले जातील. चारधाम यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था कडेकोट राहील. केदारनाथ आणि यमुनोत्रीमध्ये डॉक्टरांची विशेष पथके तैनात केली जातील. तसेच एअर ऍम्ब्युलन्सची व्यवस्था सुसज्ज ठेवण्याची सूचना आरोग्य विभागाला करण्यात आली आहे.