अलीकडे रिझर्व्ह बँक, एनएसइ, बीएससी, सेबी अशा वित्त संस्थांपासून बँका आणि टेलिफोन कंपन्याही ऑनलाईन फसवणुकीबाबत जागृतीचा संदेश ग्राहकांना देत आहेत. कारण जाहीर केले जात नसले तरी ऑनलाईन मार्केटिंग, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक आणि मोठय़ा फायद्याच्या योजनांची अमिषे दाखवून लोकांना काही हजारांपासून लाखो रुपयांचा चुना लावण्यात आला आहे. देशभरात ही रक्कम लाखो कोटीच्या घरात पोहोचते आणि तीच काळा पैसा बनून मूठभर लोकांच्या हाती एकवटते आहे. सरकारी यंत्रणेची गती फोर जी जगात गुन्हेगार मंडळींपेक्षा कमी असल्याने त्यांना रोखणे आवाक्मयाबाहेरचे ठरत असावे. तेव्हा सावधान! आता तर फाईव्ह जी येत आहे! त्यामुळेच सावधानतेचा गवगवा सुरू आहे. कष्टाने मिळवलेली, पै-पै वाचवलेली रक्कम सहजावरी लुबाडली जात आहे. दिवाळी तोंडावर असल्याने मोठी खरेदी ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे आणि फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सऍप जाहिरातींच्या माध्यमातून ग्राहकांच्या गळय़ात बोगस वस्तू घालून हजारोंची लूट सुरू झाली आहे. देशाच्या किंवा परदेशाच्या एका कोपऱयात बसून दुसऱया टोकाच्या अपेक्षित वर्गाला भुलवून लूटता येते. अपवाद वगळता स्वस्तात आकर्षक वस्तू देणाऱया कंपन्यांकडून फसवणूकच होते. अमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे त्यांच्या शिपर किंवा पुरवठादाराची इत्यंभूत माहिती असते. ग्राहकांनी ऑनलाईन ऑर्डर कधी नोंदवली, त्यानंतर शीपरने निर्धारित काळात स्टिकर, पॅकिंग, डिस्पॅच केले का? वस्तू पोहोचवणाऱयाने योग्य प्रक्रिया पार पाडून ती ग्राहकांपर्यंत पोहोचवली का? ग्राहकाला मिळालेल्या वस्तूंमध्ये त्याची फसवणूक तर झाली नाही ना? याची खात्री स्वतंत्र संदेश पाठवून केली जाते. त्यामुळे अशा ठिकाणी खराब वस्तू आली तर ती परत पाठवण्याची आणि पैसे परत मिळण्याची खात्री असते. तरीही तिथे शंभर टक्के फसवले जाणारच नाही याची खात्री नाहीच! नव्याने बाजारात आलेल्या अशाच छोटय़ा कंपन्यांकडे अशी यंत्रणाच नसल्याने ठग पुरवठादार त्यांच्या प्लॅटफॉर्मचा गैरवापर करून लोकांचे हजारो रुपये आजच्या घडीलाही लुटत आहेत. त्यामुळे ग्राहकानेच कंपनीची रिटर्न पॉलिसी काय आहे आणि वस्तू येऊन देणारा व्यक्ती परत घेऊन जाण्यास बांधील आहे का? ही माहिती घेतल्याशिवाय पैसे देणे महागात पडू शकते. आतातर वस्तू परत नेऊन पैसे भलत्याच व्यक्तीच्या खात्यावर जमा दाखवणारे ठगदेखील आले आहेत. स्थानिक बाजारात स्वस्तात मिळत नाही आणि ऑनलाईन फसवणूक होते यामुळे ग्राहक हताश आहे. घरोघरी अशी हजारो रुपयांची फसवणूक होते आहे. अशा ‘किरकोळ’ गुह्यांची नोंद, तपास करणे अशक्मय असल्याने किंवा तपासाची पद्धती माहित नसल्याने पोलीस घेत नाहीत. ग्राहक ही माहिती अक्कल खाती जमा करून गप्प बसतो आणि पुढे हजारो लोक असेच फसवले जातात. याशिवाय आकर्षक लॉटरीचे आमिष दाखवून बँक खात्यांवरील रकमेची लूट तर प्रसिद्धच आहे. 2019 मध्ये याबाबत आलेली जमतारा नावाची वेब सिरीज या लुटीच्या विश्वाचे आणि लुटणाऱयांच्या अडाणीपणाचे दर्शन घडवते. पण म्हणून गेल्या तीन वर्षात लूट थांबलेली नाही. या उलट हर्षद मेहता वरील स्कॅम 1992 या वेब सिरीज नंतर लोकांचे डिमॅट अकाउंट खोलणे वाढले, लूटही वाढली. सुचेता दलाल यांच्यासारख्या जागृत पत्रकारांनी हर्षद मेहताचा कारनामा उघडकीस आणला. पण या वेब सिरीजने हर्षदला एक राजकारणाच्या खेळात फसलेला यशस्वी उद्योजक भासवले. त्याने शेअर मार्केट लोकांच्या हातात दिले आणि लोकांना पैसे कमवायला संधी मिळवून दिली अशा पद्धतीचे चुकीचे चित्रण लोकांच्या मनात उतरले. दुर्दैवाने हर्षद घोटाळय़ानंतर अनेकांना आत्महत्या कराव्या लागल्या या वास्तवाकडे लोकांनी दुर्लक्ष केले. अशा लुटीविरुध्द झटणाऱया यंत्रणाही हताश होतात. नुकतेच कंपनी निबंधक आणि रिझर्व्ह बँकेकडून काही बोगस कंपन्यांवर निर्बंध लादून त्यांची नावेही जाहीर केली गेली. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये अल्पदरात कर्ज मिळण्यास पात्र ठरणाऱया वर्गाला हर्षद मेहताच्या पद्धतीने ‘जितना बाजार गिरेगा उतनाही बढेगा’ ‘रिस्क है तो इश्क है’ अशा संवादी भाषेत गुंडाळून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीसाठी हजारो कोटी रुपये जमवले. एक व्यक्ती स्वतः गुंतवणूक करून आपल्याला महिन्याला गुंतवणुकीच्या दहा टक्के व्याज परतावा देणार या आमिषाला लोक भुलले आणि त्या गावोगावच्या शेअर मार्केट गुरुंच्या कंपन्यांच्या हातात आपली सगळी जमापुंजी सोपवली. महिन्याला मिळालेले व्याजही पुन्हा त्यातच गुंतवले आणि एक दिवस शेअर मार्केट पडल्याचे नाटक करून अशा लोकांनी भारतभरात लोकांना गंडा घातला. वैशिष्टय़ म्हणजे या मंडळींच्या विरोधात फिर्याद देऊनही उपयोग होत नाही. अशा पद्धतीचे वातावरण तयार झाले असून हताश लोक आणि एजंट आत्महत्या करत आहेत. तरीही त्यावर समाजातून प्रतिक्रिया उमटत नाही. गेल्या 18 ऑक्टोबर मधल्या उच्चांकी पातळीपर्यंत वर्षभर मार्केटने उसळी घेतलेली नाही. बाजार कोसळण्याची शक्मयता आहे तरीही तेजीची स्वप्ने दाखवून रिस्क घ्यायला लावली जाते. प्रत्यक्ष अभ्यासाने व्यक्तीने गुंतवणूक केली आणि अपयश आले तर गोष्ट वेगळी पण कर्ज काढून दुसऱयास गुंतवणुकीला पैसा देणे हास्यास्पदच. परिणामी गावे बदलून नवे लोक फसतात. या सर्वात स्वतः डोळसपणे या प्रलोभनापासून सावध आणि शाश्वत गुंतवणुकीवर भर देणे शहाणपणाचे आहे. तसेही फ्लोटिंग व्याजदराची बँकांची चलाखी न समजलेला कर्जदार फसला आहेच. घरासाठी सरकारने दिलेली सबसिडी त्याच्या व्याजात गुंडाळली गेली आहे! ही एक वेगळीच फसवणूक!
Previous Articleबोलिवियात सर्वात धोकादायक रस्ता
Next Article राष्ट्रपिता महात्मा गांधींना जयंतीनिमित्त अभिवादन
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.