पुणे / प्रतिनिधी :
महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारण संपले आहे. आता फक्त सत्तालोभी सत्ताकारण सुरू असून, भारतीय जनता पार्टीने शिंदे गटाची फसवणूक केली असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पत्रकार परिषदेत केला.
लोंढे म्हणाले, तुम्हाला मंत्रिमंडळ विस्तारासाठी सतत दिल्लीला जावे लागते, यातच तुमचे अपयश दिसून येते. शिवसेना संपून आपल्याला सत्ता मिळवायची, ही भाजपाची संस्कृती असल्याचा आरोपदेखील लोंढे यांनी केला. मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी प्रचंड ओढाताण सुरू आहे. मंत्रिमंडळ स्थापन होत नाही, म्हणून एकनाथांच्या राज्यात महाराष्ट्र मात्र अनाथ झाला आहे. शिंदे गटाला भाजपा किंवा इतर नोंदणीकृत पक्षामध्ये विलीन होण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
मनमानी राजकारणाचा निषेध
शिवसेनाही संपवायची, सत्ताही मिळवायची, हा जो प्रयत्न भाजपाने केला आहे, ही कुसंस्कृती आहे. सध्या राज्यात शेतकरी त्रस्त झाला आहे, अतिवृष्टी झाली आहे, अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आहे. पिक विम्याचा, बी-बियाणांचा प्रश्न समोर आहे. हे सगळे वाऱ्यावर सोडून दिले आहे. आता तर कहर केला आहे. मंत्रिमंडळ स्थापन करता येत नाही, ही अतिशय अक्षम्य अशी बाब आहे. मंत्र्यांचे सर्व अधिकार सचिवांना देऊन टाकले आहेत. त्यामुळे मंत्रालयाचे सचिवालय करण्याच्या या मनमानी राजकारणाचा आम्ही निषेध करतो, असेही त्यांनी सांगितले.
अमित शाह यांच्याकडून धर्मांधता पसरवण्याचे काम; ठाकुर यांना प्रत्युत्तर
सरदार पटेल यांनी देश जोडून एक केला आहे. मात्र, अमित शाह यांनी देशामध्ये धर्मांधता पसरवत एका धर्माला दुसऱ्या धर्मासोबत लढवायचे काम केले आहे. म्हणून अमित शाह एका गिरोहाचे सरदार असल्याची टीका देखील लोंढे यांनी केली आहे. अनुराग ठाकूर यांनी आज बोलताना, मला अमित शाह यांच्यामध्ये सरदार पटेल यांची प्रतिमा दिसते, असे विधान केले होते. त्यांच्या याच विधानाला लोंढे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.