वृत्तसंस्था/ तिरुअनंतपूरम (केरळ)
28 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान तामिळनाडूतील चेन्नईजवळ असलेल्या महाबलीपुरम येथे होणाऱया 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेची क्रीडा ज्योत केरळमधील तिरुअनंतपूरम येथे दाखल झाली.
ऑलिम्पिकच्या धर्तीवर बुद्धिबळ ऑलिम्पियाड क्रीडाज्योत रॅली पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली. या क्रीडा ज्योत रॅलीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेह येथे केले होते. भारताला प्रथमच या स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची संधी लाभली आहे. केरळचे वाहतूक खात्याचे मंत्री ऍन्टोनी राजू यांनी तिरुअनंतपूरमचे जिल्हाधिकारी नवज्योत खोसा यांच्याकडून बुद्धिबळ ऑलिम्पियाड क्रीडा ज्योत स्वीकारली. ही क्रीडाज्योत येथील जिमी जॉर्ज इनडोअर स्टेडियममध्ये काही वेळ ठेवण्यात आली होती. बुधवारी ही क्रीडाज्योत लक्षद्वीपमध्ये दाखल झाली होती.
बुद्धिबळ ऑलिम्पियाड क्रीडाज्योतीचा प्रवास 40 दिवसांचा असून या कालावधीत ही ज्योत देशातील 75 शहरांना भेट देत आहे. आतापर्यंत या क्रीडा ज्योतीने आगरतळा, नेमसाई, दिब्रुगड, इटानगर, लेह, जम्मू, श्रीनगर, धर्मशाला, सिमला, चंदिगड, पतियाळा, अमृतसर, पानिपत, गुरुग्राम, कुरुक्षेत्र, डेहराडून, हरिद्वार, मिरत, कानपूर, केवाडिया, अहमदाबाद, दांडी, सुरत, जयपूर, दमन, मुंबई, पुणे, नागपूर, पणजी, भोपाळ, इंदोर, ग्वाल्हेर, झाशी, गंगटोक, सिलीगुडी, कोहिमा, शिलाँग, गुवाहाटी, रायपूर, भुवनेश्वर, पुरी, कोनार्क, विशाखापट्टणम, अमरावती, बेंगळूर आणि मंगळूर या शहरांना भेट दिली आहे. या स्पर्धेमध्ये जगातील 200 देशांचे बुद्धिबळपटू सहभागी होणार आहेत.