संस्थानकाळात शाहूपुरी व्यापारी पेठेची उभारणी : शेतीसह व्यापाराला चालना, रोजगार निर्मिती : जिल्हय़ाच्या अर्थ व्यवस्थेला बळकटी देणारी दूरदृष्टी
संजीव खाडे/कोल्हापूर
विकासाच्या दूरदृष्टीतून व्यापक जनकल्याणाचे हजारो निर्णय राजर्षी शाहू महाराजांनी घेतले. शेती, शिक्षणाच्या विकासावर भर दिला. त्याचवेळी त्यांनी व्यापारलाही पाठबळ दिले. आपल्या संस्थानात पिकणाऱया शेतमालाला जर बाजार पेठ मिळाली तर शेतकऱ्यांचा किकास होईल, व्यापारी वर्गालाही व्यापार-उदीमसाठी व्यापारपेठ मिळेल. आवक-जावक वाढल्यास अनुषंगीक रोजगाराच्या संधीही निर्माण होतील, एवढा खोलवर विचार करणाऱया शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये शाहूपुरी व्यापारी पेठ उभी करण्याचा निर्णय 1895 मध्ये घेतला. त्याआधी रेल्वे सुरू करून अखंड हिंदूस्थानशी कोल्हापूरला जोडण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराजांनी घेतला होता. रेल्वेरूपी दळणवळणाला आता व्यापाराचीही जोड मिळणार होती.
1895 मध्ये शाहूपुरी बाजार पेठेच्या उभारणी घोषणा करण्यापूर्वी कोल्हापूर संस्थानात तयार होणारा गुळ मुंबईला पाठविण्यासाठी कोकणातून जलमार्गाचा वापर करावा लागत होता. कोकणातील राजापूर बंदरातून जहाजातून कोल्हापुरी गुळ मुंबईला गेला तरी त्याची ओळख कोकणी गुळ किंवा राजापुरी गुळ अशी झाली होती. कोल्हापुरी गुळाची ओळख पुसट होत होती. त्यामुळे शाहू महाराजांनी या सर्व बाबींचा अभ्यास करून कोल्हापुरात बाजार पेठ उभी करायची. त्यातून कोल्हापुरी गुळाचा बँड विकसित करायचा, असा निश्चत केला. शाहूपुरी बाजार पेठ उभी करण्याचे आदेश दिले. आयात-निर्यात, आवक-जावक मोठय़ा प्रमाणात व्हावी, यासाठी त्यांनी परगावातील, परराज्यातील व्यापाऱ्यांनाही निमंत्रण दिले. त्यांना व्यापारपेठेत स्थान दिले. हळूहळू शाहूपुरी बाजार पेठ विकसित होत गेली. कोल्हापुरी गुळाचा आता कोकणऐवजी थेट मुंबईच्या बाजारपेठेत सुरू झाला. कोल्हापुरी गुळाची ओळख निर्माण झाली. नंतर तो ब्रँड झाला.
केवळ शाहूपुरी बाजारपेठ केवळ गुळाच्या उत्पादनावर अवलंबून राहून चालणार नाही. तर इतर उत्पादने असल्याशिवाय विकास होणार नाही, हे जाणणाऱ्या शाहू महाराजांनी इतर शेतमालासह वस्तूंच्या व्यापाऱ्यांनाही प्रोत्साहन दिले. आज सव्वाशे वर्षांनंतरही शाहूपुरी बाजारपेठेची ओळख कायम आहे. एकेकाळी शाहूपुरीच्या बाजार पेठेत अडत्यांची दुकाने, गुळाचे रवे घेऊन येणाऱया बैलगाडय़ा, नंतर टँक्टर असे चित्र दिसत असे. कालांतराने शाहूपुरी बाजार पेठेतील गुळाचा व्यापार शाहू मार्केट यार्डात नेण्यात आला. महाराजांनी सुरु केलेल्या रेल्वेतून मार्केट यार्डच्या लगत असणाऱ्या गुडस् यार्डमधून कोल्हापुरी गुळाचा परराज्यात, परदेशात प्रवास सुरू झाला. गुळाच्या व्यापाराबरोबर अन्नधान्याची बाजारपेठ विकसित झाली. परराज्यातून आयात, निर्यात वेगावली. कांदा, बटाटा व्यापार वृद्धीगत झाला. आपल्या संस्थानात धरणे, बंधारे उभारून शेतकऱ्यांच्या शेतीला मुबलक पाणी देऊन शिवार फुलणाऱया शाहू महाराजांनी गुळासह इतर शेतमालाला बाजार पेठ मिळवून दिली. शेतकऱयांबरोबर व्यापाऱयांचेही कल्याण केले. बाजारपेठेमुळे वाहतुकीला, हमाल, तोलाईदार व इतर कष्टकरी घटकांना रोजगार उपब्लध झाला. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर सहकारी तत्वावरील संस्थांना निर्माण झाल्या. शेती उत्पन्न बाजार समिती ही देखील सहकारातील शेतकऱयांसाठी महत्वाची संस्था. कोल्हापूरच्या बाजार समितीत गुळाबरोबर इतर शेती उत्पादनाची उलाढाल होते. गेल्या सव्वाशे वर्षात कोल्हापूरचा शेती, व्यापारामध्ये जो विकास झाला आहे. कोटय़वधींची उलाढाल होत आहे. त्यामागे राजर्षी शाहू नावाच्या एका बहुजन उद्धारक राजाची दूरदृष्टी आहे. त्यांच्यामुळे कोल्हापूरचे अर्थकरण बदलले. बळकट झाले.
कोल्हापूरच्या विकासाचे श्रेय फक्त राजर्षी शाहू महाराजांना
अर्थ व्यवस्थेचा कणा असणारी शेती आणि व्यापार यांच्या माध्यमातून भविष्यातील विकास साधता येतो, याची जाणीव सव्वाशे वर्षांपूर्वी ठेवून त्या दृष्टीने कृतीशिल निर्णय घेणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांमुळे आज कोल्हापूरची शेती, व्यापार आणि अर्थकरण बळकट झाले आहे. समृद्धी आली. कुणीही लोकप्रतिनिधीने महाराज यांच्या नंतर त्यांच्या जवळ जाणारे विकासाचे कार्य केलेले नाही. आजही शाहू महाराजांनी केलेल्या कार्यावर आणि आखून दिलेल्या मार्गावर कोल्हापूरची वाटचाल सुरू आहे.