खानापूर / प्रतिनिधी
संकल्पयात्रेच्या निमित्ताने बुधवार दि. 9 रोजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री, जिल्हय़ातील आमदार-खासदार उपस्थित राहणार आहेत. या संकल्पयात्रेची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती भाजपच्या पदाधिकाऱयांनी भाजप कार्यालयात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी म्हणाले, मुख्यमंत्री बसवराज बोम्माई हे पहिल्यांदाच खानापुरात येत आहेत. त्यांच्यासोबत जिल्हय़ातील आमदार, खासदार व मंत्री या सभेत उपस्थित राहून भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यामुळे तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये अमाप उत्साह निर्माण झाला असून बुधवारी दुपारी 4 वाजता मलप्रभा क्रीडांगणावर 20 हजार भाजप कार्यकर्ते सभेला उपस्थित राहतील.
भाजपचे ज्येष्ठ नेते विठ्ठल हलगेकर म्हणाले, मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची सभा होणे ही निवडणुकीची नांदीच असून भाजप कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहून भाजपचा जनाधार मुख्यमंत्र्यांना दाखवून द्यावा, तसेच तालुक्यातील विकासाचाही मुद्दा मुख्यंमत्र्यांसमोर मांडणार आहोत.
राज्य कार्यकारिणी सदस्य धनश्री सरदेसाई म्हणाल्या, स्थानिक आमदार समाज माध्यमांवरून मुख्यमंत्र्यावर टीका करत आहेत. ज्यावेळी शहरात व तालुक्यात महापूर होता, त्यावेळी आमदार महाशय कुठे होत्या? कोरोना महामारीत तालुक्यात हाहाकार माजला होता, तेव्हा आमदार गायब होते. मात्र भाजपचे कार्यकर्ते आणि मंत्री रस्त्यावर काम करत होते. तालुक्याचा विकासात्मक दृष्टिकोन ठेवून मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यापेक्षा विकासकामे मंजूर करून घेणे गरजेचे आहे.
जि. पं. माजी सदस्य बाबुराव देसाई म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या होणाऱया सभेमुळे भाजपचा विजय निश्चित आहे. कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱयानंतर सक्रिय रहावे. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष संजय कुबल म्हणाले, मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांचा दौरा हा तालुक्याच्या विकासाबाबतचा आराखडा आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी सखोल चर्चा करून तालुक्यात आवश्यक असलेली विकासकामे मंजूर करून घेणार आहोत. मुख्यमंत्र्यांकडे वनखाते असल्याने तालुक्यातील दुर्गम भागातील रस्ते, पाणी, वीज सुविधांबाबत पाठपुरावा करणार आहोत. यासाठी निवेदनही तयार आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱयावेळी तालुक्याच्या विकासाबाबत चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
पत्रकार परिषदेवेळी नुकताच भाजपात प्रवेश केलेले मराठी भाषिक नेते म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या दौऱयावेळी त्यांच्या उपस्थितीत तालुक्यातील मराठी भाषिक बहुसंख्य कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे भाजपाला बळकटी येणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱयातच वादावादी
मुख्यमंत्र्यांच्या दौऱयानिमित्त त्यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत. सोमवारी रात्री काही बॅनर काढल्याने मोठा वाद रंगला होता. ज्यांनी हे बॅनर काढले त्यांची नावे सांगा, असा आग्रह काही कार्यकर्त्यांनी लावून धरला होता. बराचवेळ याबाबत वाद सुरू होता. मुख्यमंत्र्यांच्या दौऱयातच भाजपातील वादावादी व गटबाजी उघड होत आहे.