अनिलभाऊंची साद, मुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद
विटा/प्रतिनिधी
बिहार राज्यातील पाटणा येथे गुरसाळेतील गलाई बांधवावर संकट कोसळले. उपचारासाठी पुणे किंवा मुंबईतील दवाखान्यात तातडीने हालवण्याची गरज होती. सर्व प्रयत्न थांबल्यावर गलाई बांधवांनी आमदार अनिल बाबर यांना फोन केला. आमदार बाबर यांनी तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधला गतीने यंत्रणा फिरली आणि मध्यरात्रीपर्यंत एअर अॅम्बुलन्सने रूग्ण पुण्यात हलवण्यात आले. गलाई बांधवांना संकटात ‘नाथ’ पावला असेच म्हणावे लागेल.
बिहार मधील पाटणा येथे महाराष्ट्रातील मौजे गुरसाळे, ता. खटाव जि. सातारा येथील अमोल जाधव यांचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी वास्तव्यास आहे. शनिवारी मध्यरात्री दोन वाजता राहत्या घरात गॅसच्या गळतीने मोठा स्फोट होऊन कुटुंबातील चारही लोकांना मोठ्या प्रमाणात भाजले. त्यांना तात्काळ पाटणा येथे खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु तेथील डॉक्टरांनी रूग्णांना पुढील उपचारासाठी पुणे किंवा मुंबई येथे जळालेल्या रूग्णांवर उपचार करणाऱ्या स्पेशल दवाखान्यात हलविण्यास सांगितले. त्यानंतर या कुटुंबाच्या नातेवाईकांनी पुढ उपचारासाठी पुण्याला नेण्याचा निर्णय घेतला आणि ऐअर अॅम्ब्युलन्स मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
यावेळी ऐअर अॅम्ब्युलन्स कंपनीने एकावेळी एकच रूग्ण नेता येईल असे सांगितले. त्यामुळे सदर कुटुंबाचे नातेवाईक हतबल झाले. त्यावेळी एका नातेवाईकाने खानापूरचे आमदार अनिल बाबर यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपर्क केला. संपर्क झाल्यावर नातेवाईकांनी सर्व हकीकत मुख्यमंत्र्यांना सांगितली. त्यानंतर तात्काळ सूत्रे फिरण्यास सुरूवात झाली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रथम आणि नंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना अतितात्काळ शासकीय ऐअर अॅम्ब्युलन्स मिळण्यासाठी विनंती केली, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे शासकीय ऐअर अॅम्ब्युलन्स उपलब्ध होऊ शकली नाही. वेळ अतिशय नाजूक असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनाविलंब स्वखर्चातून दोन ऐअर अॅम्ब्युलन्स बुक केल्या. त्या कुटुंबाला दिवस उजाडण्याच्या आत पुण्यात आणण्याचे आदेश शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांना दिले आणि दिवस उजाडण्याच्या सुमारास पहिले विमान दाखल झाले. जखमीपैकी ११ वर्षाच्या मुलास घेऊन आज सकाळी ६ वाजता स्पेशल विमान ( ऐअर अॅम्ब्युलन्स) पुण्यातील लोहगाव विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर जखमीपैकी दुसऱ्या १२ वर्षाच्या बालकास घेऊन दुसरे विशेष विमान सकाळी ११वाजता विमानतळावर दाखल झाले. दोन्ही जखमी रुग्णांना पुण्यातील सूर्या सह्याद्री रूग्णालयात दाखल केले असून तेथे उपचार सुरू आहेत.
एकूणच आमदार अनिल बाबर यांनी दाखविलेली तत्परता आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संवेदनशीलता यामुळे जाधव कुटुंबीय भारावून गेले होते. संकटात गलाई बांधवांना ‘नाथ’ पावला, अशीच काहीशी त्यांची प्रतिक्रिया असावी.
यावेळी महाराष्ट्र मंडळ पटना (बिहार) सेक्रेटरी संजय भोसले, विठ्ठल घोडके, विजय पाटील, शंकर किर्दत, राजेंद्र पवार, आनंद पवार, सुनिल शिंदे, संतोष पवार, प्रदिप पाटील, अधिक मोरे, संजय पाटील, अनिल गायकवाड, जयचंद पवार, तानाजी पवार यांनी सहकार्य केले.