आपण एक कुशल संघटक आहोत पण वक्ते नाही ही मर्यादा न जाणता उद्धव ठाकरे यांना मैदानात आव्हान देणे एकनाथ शिंदे यांना महागात पडले. राजकारण हा प्रतिमांचा आणि संदेशाचा खेळ आहे. तिथे असले भलते धाडस करण्याने डाव उलटू शकतो. सगळे आमदार-खासदार अख्खी महाशक्ती अशावेळी उपयोगाची ठरत नाही, हे दसरा मेळाव्याने मुख्यमंत्री शिंदे यांना दाखवून दिले आहे.
खरे तर खुद्द भाजप, नारायण राणे आणि राज ठाकरे यांना जे जमले नाही ते एकाच डावात शह देऊन उद्धव ठाकरे यांना मात देण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी साधले होते. पण या यशाला जपत पुढे जाण्याऐवजी उध्दव ठाकरे यांना आव्हान देत राहण्यात त्यांचा वेळ चालला आहे. आज उद्धव ठाकरेंकडे आमदार, खासदार कमी आहेत. पक्ष आणि चिन्हाचेही आव्हान उभे राहिले आहे. शिवसेनेत उद्धव ठाकरे यांना मात देण्याची इच्छा अनेकांची होती. मात्र ती साधता आली ती केवळ एकनाथ शिंदे यांना. उद्धव ठाकरे यांचे आजारी असणे आणि केंद्रातील शक्ती त्यांच्या विरोधात उभी राहणे, बंड घडावे यासाठी तपास यंत्रणांच्या मदतीने वातावरण निर्माण करणे शिंदे यांना बंडासाठी उपयोगी पडले. भाजपने बंड करायला तयार झालेल्या एकनाथ शिंदे यांना सर्वतोपरी मदत केली. राज्याबाहेर पडलेल्या आमदारांना संरक्षण देऊन भाजपशासित राज्यात सुखरूप स्थळी ठेवले, बंड फसू नये म्हणून वातावरण अधिक अस्वस्थ बनवले. त्याचवेळी घटनात्मक पेच निर्माण होईल अशा पद्धतीची खेळी करणे आणि राज्यपालांच्या मदतीने सत्तांतराची संहिता लिहून काढणे भाजपला शक्य झाले. या संहिते बरहुकुम शिंदे आपली भूमिका निभावत राहिले आणि सत्तानाटय़ाचा एक अंक त्यांनी रंगवला, देवेंद्र फडणवीस यानाही अनपेक्षितपणे मागे टाकत त्यांनी मुख्यमंत्रीपद पटकावले. ठाकरे यांच्यासमोर आव्हान उभे केले. पण, या सर्व यशाच्या स्थितीने त्यांना आणि त्यांच्या अनुयायी मंत्री-आमदारांना नको तितका उत्साह संचारला. शिवाजी पार्कची लढाई जिंकली तरी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना ठाकरे आणि त्यांच्या वकिलांच्या वाटय़ाला हताशा आली होती. आपलाच पक्ष खरा आणि आपलीच बाजू योग्य कशी हे न्यायालयाला, निवडणूक आयोगाला कसे पटवावे हा त्यांच्यासमोर प्रश्न होता. त्यापूर्वी राज्यपालांची गैरवर्तणूक, सुटीकालीन न्यायालयाने दिलेला निर्णय यामुळे उध्दव ठाकरे यांना हताशपणे मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते. नेमके हे आक्रमकपणे सांगणेही त्यांना कठीण होते. पण, आता दसरा मेळाव्यानंतर न्यायालय आणि निवडणूक आयोगाच्या दृष्टीत काही नवी तथ्ये येण्यास मदत झाली आहे. शिंदेगटाच्या अतिउत्साही आव्हान देण्याचे महाराष्ट्रातील शिवसेनेची ताकद आजही उध्दव ठाकरे यांच्याच पाठीशी आहे हे खुद्द उध्दव ठाकरे यांनाही समजून आले. शिंदे यांनी गर्दी जमवली. पण त्या गर्दी इतकीच बदनामीही त्यांच्या गटाच्या वाटय़ाला आली. बंडखोर मंत्र्यांना पैसा पाण्यासारखा खर्चूनसुद्धा अपेक्षित उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नाही. जो उद्धव ठाकरेंना सहज मिळून गेला. आजपर्यंत दसरा मेळाव्याला न फिरकणारा ग्रामीण भागातील सर्वसामान्य शिवसैनिक पदरमोड करून आपला पक्ष आणि नेत्यासाठी धावला.
आरोपांना उत्तराचा प्लॅन फसला
गेल्या वेळच्या वार्तापत्रात गटप्रमुखांच्या मेळाव्याच्या हवाल्याने उद्धव ठाकरे यांनी आपले लक्ष भाजपवर अधिक केंद्रित केले आहे याचा उल्लेख केला होताच. यावेळीही तसेच झाले. उद्धव ठाकरे आपल्यावर बोलतील, त्याचा खुलासा करण्याच्या नादात त्यांच्या भाषणानंतर बोलण्याचा एकनाथ शिंदे यांनी प्लॅन केला. पण त्यांना अपेक्षित असलेले मुद्दे सोडून भाजप, संघ यांच्यावर ठाकरे यांनी टीका केली. महागाई, बेरोजगारी आणि संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्या टीकेचा आधार घेत सरकारवर ठाकरेंनी टीका केली. काँग्रेसशी युती केली म्हणून आपल्या हिंदुत्वावर बोट दाखवणाऱयाना सर्व संघाला मोहन भागवत मशिदींना भेटी का देत आहेत? असा प्रश्न करून त्यांच्या स्त्रियांच्या सन्मानाच्या मुद्याला त्यांनी बिलकीस बानोवर अत्याचार करणाऱयांची सुटका आणि सत्कार तसेच अंकिता भंडारी प्रकरणाशी जोडले. या मुद्यांना एकनाथ शिंदे यांच्याकडे उत्तर नव्हते. उद्धव ठाकरे यांचे उत्स्फूर्त भाषण आणि एकनाथ शिंदे यांचे वाचून दाखवणे यातील तफावत सर्वांना दिसून आली. शिंदे यांच्या भाषणावेळी बहुतांश लोकांनी मैदान सोडले तर उध्दव ठाकरे यांचे भाषण संपेपर्यंत गर्दी कायम राहिली. याने सरकारची डोकेदुखी वाढणार आहे. शिंदे गट गर्दी जमवू शकतो. पण या गर्दीचे ते समर्थकांत परिवर्तन करू शकतील का? या प्रश्नाचे उत्तर नकारात्मक आहे.
ठाकरेंची भाऊबंदकी, भाजपची फौज
वाहतूक साधने, सोशल मीडिया, वृत्त वाहिन्यांचा पुरेपूर वापर, प्रचंड जाहिरातबाजी, सभेचे इव्हेंटमध्ये झालेले रूपांतर हे शिंदे यांच्या सभेचे वैशिष्टय़ होते. पण ते सगळेच नंतर अंगाशी आले. ठाकरे परिवारातील भाऊबंदकीची पुन्हा एकदा चर्चा झाली. जयदेव ठाकरे आणि स्मिता ठाकरे दोघांनीही वेगवेगळय़ा वेळी शिंदे यांच्या व्यासपीठावर येणे, शिंदे यांना एकटे पडू नका आणि निवडणूका घेऊन पुन्हा शिंदेशाही आणा हे जयदेव ठाकरे यांचे आवाहन बंडखोरांसाठीही आश्चर्यकारक होते.
शिवराज काटकर