भाजपने नदी कर्नाटकला विकल्याचा आरोप, म्हादई वाचविण्यासाठी मोहीम चालविणार
प्रतिनिधी /मडगाव
कळसा-भंडुरा येथे म्हादई नदी वळवण्याच्या कर्नाटकच्या योजनेवरून भाजपवर टीका करताना आम आदमी पक्षाने (आप) मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ‘खोटी आणि विरोधाभासी विधाने’ करून गोव्यातील जनतेला मूर्ख बनवल्याबद्दल त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हा मुद्दा अधोरेखित करण्यासाठी आणि सर्व गोमंतकीयांना एकत्र आणण्यासाठी पक्ष एक मोहीम सुरू करत आहे. भविष्यातील पिढय़ांच्या हिताच्या दृष्टीने म्हादई नदी वाचवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी तसेच सत्ताधारी आमदारांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना आम आदमी पक्षाचे गोवा अध्यक्ष ऍड. अमित पालेकर यांनी, कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन कळसा-भांडुरा जलप्रकल्पाला मंजुरी देण्यासंदर्भात मुख्यमंत्री सावंत यांनी केंद्र सरकारसमवेत षड्यंत्र रचल्याचा आरोप केला. भाजपने म्हादई कर्नाटकला विकली आहे. मुख्यमंत्री नुकतेच अधिकृत दौऱयावर दिल्लीला गेले होते. त्यांचा या कटात सहभाग असून केवळ आपली खुर्ची वाचवायची असल्याने ही तडजोड झाल्याचे दिसून येत आहे. कर्नाटकातील आगामी निवडणूक लक्षात घेऊन ही मान्यता देण्यात येत असल्याचे त्यांना माहीत होते, असा दावा त्यांनी केला.
अभ्यास न करता मुख्यमंत्र्यांकडून विधाने
मुख्यमंत्र्यांना कायद्याचे ज्ञान कमी आहे. योग्य अभ्यास न करता आणि कायदेशीर पार्श्वभूमी विचारात न घेता ते विधाने करत आहेत. गोवा सरकारने याबाबत कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. मुख्यमंत्री पूर्णपणे अपयशी ठरले असून ते खोटे बोलत आहेत. गोव्याचे हित जपण्याच्या दृष्टीने केंद्राला बाजू पटवून देण्यात अपयशी ठरल्याबद्दल त्यांनी राजीनामा द्यायला नको का, असा प्रश्न पालेकर यांनी उपस्थित केला.
कर्नाटकला वन कायद्याच्या आधारे मंजुरी प्राप्त होणे आवश्यक आहे असे विधान करून मुख्यमंत्री लोकांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्र्यांना अशी विधाने यापूर्वी केली आहेत. पण त्यांनी यावर काहीच का केले नाही, असा सवाल आपचे बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस यांनी केला.
भाजपने पुन्हा एकदा गोमंतकीयांचा विश्वासघात केला आहे. म्हादई हा गोव्यासाठी राजकीय, आर्थिक किंवा सामाजिक प्रश्न नसून तो गोव्याच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, असे वाल्मिकी नाईक म्हणाले. भाजपच्या ज्या आमदारांना म्हादई वाचणे आवश्यक आहे असे वाटते ते आमच्या मोहिमेत सामील होऊ शकतात, असे प्रा. रामराव वाघ म्हणाले.