मंत्रिमंडळ विस्ताराबाबत करणार चर्चा ः पक्षश्रेष्ठीच घेणार अंतिम निर्णय
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य मंत्रिमंडळ विस्तारासाठी आपण लवकरच नवी दिल्लीला जाणार आहे. मंत्रिमंडळात कोणाकोणाला स्थान द्यावे, याबाबत हायकमांडच अंतिम निर्णय घेणार आहे. या निर्णयाला सर्वांनी कटिबद्ध असले पाहिजे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली आहे.
राज्य मंत्रिमंडळात सध्या 6 जागा रिक्त आहेत. केवळ या जागांची भरती होईल की मंत्रिमंडळ पुरर्नचना होणार, याविषयी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेले नाही. मात्र आपण लवकरच हायकमांडच्या भेटीसाठी दिल्लीला जाणार असल्याचे शनिवारी सांगितले आहे. काही आरोपांमुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या के. एस. ईश्वरप्पा, रमेश जारकीहोळी यांना मंत्रिमंडळात पुन्हा स्थान देणार का, या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, याविषयी अंदाजे उत्तर देणे शक्य नाही. मात्र, पक्षश्रेष्ठीच अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी चित्रदुर्ग जिल्हय़ातील होसदुर्ग येथे आल्यानंतर हेलिपॅडवर मुख्यमंत्री बोम्माई यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. ते म्हणाले, मंत्रिमंडळात स्थान मिळविण्यासाठी अनेकांचे प्रयत्न होणे साहजिकच आहे. कोणाला संधी द्यावी, हे हायकमांडच्या हाती आहे, असे त्यांनी सांगितले.
रेल्वे मार्गासाठी 100 कोटी रु.
तुमकूर-चित्रदुर्ग-दावणगेरे दरम्यानच्या रेल्वे मार्गासाठी भू-संपादन करण्याकरिता 100 कोटी रुपये अनुदान देण्यात येणार आहे. सरकारकडे पैशांची कमतरता नाही. काही ठिकाणी भू-संपादनात अडथळे निर्माण झाले आहेत. ते दूर करून शक्य तितक्या लवकर रेल्वेमार्गाचे काम हाती घेऊन पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.