मुंबई :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी भावनिक आवाहन करुनही बंडखोर नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) माघारी फिरायला तयार नाहीत. तुम्ही सत्तेतून बाहेर पडा अशी ठाम भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगला सोडण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडतावेळी हजारो शिवसैनिकांनी ठाकरे यांना गराडा घातला. वर्षा ते मातोश्री अशा ९ किलोमीटरच्या प्रवासादरम्यान मुंबईचे रस्ते देखील भावुक झाले. कट्टर शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाच्या गगनभेदी घोषणा देऊन शिवसैनिक पक्षनेतृत्वाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असल्याचं दाखवून दिलं. यावेळी सगळेच कार्यकर्ते कमालीचे भावूक झाले होते. शेकडो शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंवर फुलांचा वर्षाव केला. मुख्यमंत्रीही शिवसैनिकांचं प्रेम पाहून गलबलून गेले, त्यांच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं. त्यांनी शिवसैनिकांचं अभिवादन स्वीकारत गर्दीतून वाट काढली अन् गाडीत बसून मातोश्रीच्या दिशेने निघून गेले. यावेळी त्यांच्याबरोबर पुत्र आदित्य ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे देखील होत्या.
त्यांच्या सन्मानासाठी बंगल्याबाहेर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, दीपाली सय्यद यांच्यासह अनेक सेना पदाधिकारी होते. सगळ्यांनी आपल्या हातात असलेल्या फुलांचा वर्षाव मुख्यमंत्र्यांवर केला. शेकडो शिवसैनिकांनी गगनभेदी घोषणा दिल्या. उद्धव ठाकरे साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है… कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला….. अशा घोषणांनी वर्षा बंगल्याचा परिसर दुमदुमून गेला. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राला फेसबुक लाईव्हद्वारे संबोधित केल्यानंतर अवघ्या २ तासांत वर्षा बंगला सोडला. शिवसेनेचा लढण्याचा इतिहास आहे. कितीही संकटे आली तरी आम्ही आमचा स्वाभिमान गहाण ठेवणार नाही. आम्ही असत्याच्या विरोधात लढणारे लोक आहोत. शेवटी सत्याचा विजय होईल, असं संजय राऊत यांनी सांगून एकनाथ शिंदेविरोधातला संघर्ष आणखी तीव्र झाल्याचंच एकप्रकारे अधोरेकित केलं. राऊतांच्या या आक्रमक भूमिकेनंतर मुख्यमंत्र्यांनी वर्षा सोडताना आक्रमक पण त्याला भावनिकतेची जोड देऊन ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल जावं, असं सांगत शिवसेना भाजपबरोबर जाणार नसल्याचंच निक्षून सांगितलं.