मंत्री, आमदार व मान्यवरांची उपस्थितीती, शिवस्मारक व हेडलॅण्ड सडय़ावरील किल्ल्याच्या विकासाचे मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन
प्रतिनिधी /वास्को
चिखलीत वास्को शहराच्या प्रवेशव्दारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 23 फुट उंच पुर्णांकृती पुतळय़ाचे अनावरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सोमवारी संध्याकाळी करण्यात आले. मुरगाव हिंदु समाजाच्या शिवस्मारकातील या पुतळय़ाचे अनावरण करताना मुख्यमंत्र्यांनी या स्मारकाच्या पुढील विकास आणि सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे तसेच हेडलॅण्ड सडय़ावरील वारसा असलेल्या किल्ल्याचाही विकास करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
शिवस्मारकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळय़ाचे अनावरण तसेच भगवा ध्वज फडकावण्याचे कार्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवप्रेमींच्या मोठय़ा उपस्थितीत करण्यात आले. यावेळी समारंभाच्या व्यासपिठावर मंत्री माविन गुदिन्हो, मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार दाजी साळकर, आमदार संकल्प आमोणकर, भाजपा प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे, मुरगावचे नगराध्यक्ष दामोदर कासकर, विश्व हिंदु परिषदेचे अशोकराव चौगुले, मुरगाव हिंदु समाजाचे अध्यक्ष नारायण बांदेकर, समाजाचे उपाध्यक्ष शेखर खडपकर, सरचिटणीस संतोष खोर्जुवेकर, स्मारक समितीचे अध्यक्ष किरण नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते. शिवस्मारकातील जागा कमी पडल्याने शिवप्रेमींनी मुख्य रस्त्याच्या पलिकडून तसेच चिखली नाक्यापर्यंत उभे राहून या समारोहात उपस्थिती दर्शवली. विशेष म्हणजे या संपूर्ण समारोहात वास्कोचा नामोल्लेख टाळून संभाजीनगर असाच गजर सुरू होता. आमदार दाजी साळकर यांचा उल्लेखही संभाजीनगरचे आमदार असाच करण्यात आला.
शिवस्मारक आणि हेडलॅण्ड सडय़ावरील किल्ल्याच्या विकासाचे आश्वासन
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी बोलताना छत्रपती शिवरायांची शिकवण समाजापर्यंत पोहोचायला हवी. नवीन पिढीला शिवरायांच्या कतृत्वाचा इतिहास कळायला हवा. त्यासाठीच गोवा विद्यापिठातही छत्रपतींच्या इतिहाचे अध्ययन करण्याची सोय सरकारने केलेली आहे. या इतिहासाची नवीन पाठपुस्तके शालेय विद्यार्थ्यांना पुढील वर्षापासून लागू होतील असे मुख्यमंत्री म्हणाले. चिखलीतील शिवस्मारकाची उभारणी हे अभिनंदनीय कार्य असून या स्मारकाच्या पुढील विकासासाठी सरकार पर्यटन खात्याच्या माध्यमातून निधी उपलब्ध करेल. तसेच हेडलॅण्ड सडय़ावरील दुर्लक्षीत राहिलेल्या किल्ल्याचा विकास करण्याचे कामही सरकार येत्या चार वर्षात करेल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी सरकारने हेडलॅण्ड सडय़ावरील किल्ल्याचा विकास करण्याची मागणी या समारोहात केली होती. या किल्ल्याला इतिहास असून त्याचे रक्षण करावे. हा किल्ला सध्या एमपीएच्या कब्जात असून हा किल्ला अडचणीतून मुक्त करावा अशी मागणी आमदार संकल्प आमोणकर यांनी आपल्या भाषणात केली होती. मुख्यमंत्र्यांनीही लगेच या मागणीची दखल घेतली.
मुरगाव तालुक्यासाठी गर्वाचा आणि अभिमानाचा क्षण- मंत्री माविन गुदिन्हो
मंत्री माविन गुदिन्हो यांनीही यावेळी बोलताना मुरगाव तालुक्यात शिवस्मारक उभारण्यात आले हा गर्व करण्यासारखा क्षण असल्याचे सांगितले. आज आपण आपली संस्कृती आणि इतिहास विसरत चाललो आहोत. आपण पाश्चिमात्यकरणाकडे वळत आहोत. आपल्या शिक्षणातून संस्कृती व इतिहास हवा त्या प्रमाणात मांडला जात नाही. परंतु आपण आपली संस्कृती व इतिहास विसरता कामा नये. हा ठेवा राखला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजे सर्वात यशस्वी योध्दे होते. त्यांची आठवण आम्ही मुरगावात जागृती केलेली आहे हे श्रेष्ठ कार्य आहे. शिवरायांच्या कतृत्व जागवण्यासाठी आम्ही एकत्र येतो ही आनंद करण्यासारखी गोष्ट असल्याचे सांगून मंत्री माविन गुदिन्हो यांनी अयोध्येतील जागातील मोठय़ा श्रीराम मंदिराची उभारणी हे सुध्दा रक्षणाचे व अभिमानाचे कार्य असल्याचे नमूद केले.
छत्रपती शिवाजीचा आदर्श ठेवून गोव्यात सुशासन निर्माण करू-मंत्री सुभाष फळदेसाई
पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी यावेळी बोलताना आज स्वराज्याभिषेक दिन हा गोव्यासाठी सुवर्ण अक्षरांनी नोंद करण्यासारखा ठरल्याचे स्पष्ट केले. यंदा शासकीय पातळीवर हा सोहळा साजरा करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे गोमंतकीयांमध्ये नवीन उर्जा निर्माण झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श राजा होते. कोणतीही परकीय सत्ता असो त्यांना थरथर कापत होती. ते हिंदुंचे रक्षणकर्ते होते. त्यांनीच हिंदुत्वाची ज्वाळा पेटवली असे सांगून त्यांनी छत्रपतींच्या कर्तृत्वाचा आढावा घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा मातीचा इतिहास आहे. तो विसरता कामा नये. त्यांचा आदर्श घेऊन तसेच त्यांच्या कतृत्वाच्या पावलांवर पाऊल ठेवून आम्ही गोव्यात सुशासन निर्माण करू अशी ग्वाही मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.
या समारोहात आमदार दाजी साळकर, आमदार संकल्प आमोणकर यांचीही भाषणे झाली. मुरगाव हिंदु समाजाचे अध्यक्ष नाना बांदेकर यांनी उपस्थितांचे स्वागत करताना समाजाच्या कार्याची माहिती दिली. शिवस्मारक समितीचे अध्यक्ष किरण नाईक यांनी स्मारक उभारण्याची कल्पना ते ही कल्पना पूर्णत्वास येईपर्यंतच्या कामगीरीचा प्रवास कथन केला.