संमेलनाध्यक्ष प्रा. अशोक आलगोंडी यांचे प्रतिपादन, 22 वे मराठी बालसाहित्य संमेलन उत्साहात
प्रतिनिधी/ बेळगाव
आजची मुले, पालक व शिक्षक पाठ्यापुस्तक गुणवत्तेच्या पाठीमागे पडले आहेत. त्यामुळे मुले सृजनशील होताना दिसत नाहीत. याला पालक, समाज आणि शिक्षण व्यवस्थादेखील जबाबदार आहे. तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने मुलांची कल्पनाशक्ती आणि सृजनशीलता कमी झाली आहे. त्यामुळे भावी पिढी शक्तिशाली बनविण्यासाठी बालवयातच उत्तम दर्जाचे साहित्य हाती पडणे आवश्यक आहे, असे मत प्रा. अशोक आलगोंडी यांनी व्यक्त केले.
गुरवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी बेळगाव आयोजित शनिवारी 22 वे मराठी बालसाहित्य संमेलन उत्साहात पार पडले. यावेळी ते संमेलनाध्यक्ष म्हणून बोलत होते. कॅम्प, गोगटे रंगमंदिर येथील कवयित्री शांता शेकळे साहित्यनगरीत हे संमेलन झाले.
व्यासपीठावर प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर, उद्घाटक आर. एम. चौगुले, सचिव सुभाष ओऊळकर, विद्यार्था प्रतिनिधी सौम्या पाखरे आदी उपस्थित होते. विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन झाले. जयंत नार्वेकर यांनी स्वागत केले. सौम्या पाखरे हिने प्रास्ताविक केले. कुशल गोरले, अथर्व गुरव यांनी परिचय करून दिला.
प्रा. आलगोंडी म्हणाले, बाळाचा जन्म झाल्या झाल्या काही दिवसांतच त्याच्या हातात स्मार्ट फोन दिला जातो. त्यामुळे लहान मुलेही स्मार्ट फोनच्या विश्वातच रमत आहेत. आजची पिढी निरोगी आणि सुसंस्कृत बनविण्यासाठी योग्य वेळी त्यांच्या हातात बालसाहित्य देणे गरजेचे आहे. कुटुंबातील संवाद कमी झाला आहे. काळाच्या ओघात आजी-आजोबा हे विद्यापीठदेखील नाहीसे झाले आहे. त्यामुळे बालवयात मुले संस्काराविना राहू लागली आहेत, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.
यावेळी उद्घाटक आर. एम. चौगुले म्हणाले, बालवयात साहित्याची आवड निर्माण व्हावी, यासाठी बालसाहित्य संमेलन भरविणे ही कौतुकास्पद बाब आहे. असे उपक्रम राबवून पिढी संस्कारमय बनविणे काळाची गरज बनली आहे.
सकाळी मराठी विद्यानिकेतन शाळेपासून आकर्षक ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला. मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होऊन ग्रंथदिंडी मार्गस्थ झाली. यामध्ये विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करून लेझीम प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी विद्यार्थ्यांचा अमाप उत्साह दिसून आला. गोगटे रंगमंदिरमध्ये या ग्रंथदिंडीची सांगता झाली.
संमेलनाच्या पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर कथा सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. यावेळी मधुरा मुरकुटे हिने ‘आनंद यात्री’, मनाली बराटे हिने ‘झेल्या’, कुशल गोरल हिने ‘प्रसंगावधान’, समृद्धी सांबरेकर हिने ‘गण्याची धमाल’, समृद्धी पाटील ‘गुरुजी, बे दुनी किती’ अशा धीरगंभीर आणि विनोदी कथा सादर करून रसिकांची वाहव्वा मिळविली.
संमेलनातील दुसऱ्या सत्रात शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘शांतांजली’ हा गीत गायनाचा कार्यक्रम झाला. यामध्ये विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी ‘मराठी पाऊल पडते पुढे’, ‘मी डोलकर मी डोलकर दर्याचा राजा’, ‘जीवन गाणे गातच राहावे’, आदी गीते सादर करून कार्यक्रमात रंगत वाढविली.
संमेलनातील तिसऱ्या सत्रात बालकवींनी विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या एकापेक्षा एक सुंदर कवितांचे सादरीकरण केले. समृद्धी पाटील हिने ‘दारूबंदी’, सर्वेश सुतार याने ‘जीवनरहस्य’, स्नेहल दळवी हिने ‘एक व्यक्ती हक्काची’, पवन पाटील याने ‘आई’, लावण्या सांबरेकर हिने ‘बाबा’, प्रथमेश चांदीलकर याने ‘प्लास्टिक’, सौम्या पाखरे हिने ‘अस्तित्व’, किरण लोहार याने ‘मोबाईल यंत्रा’, समीक्षा अष्टेकर हिने ‘माय बोली’ आदी कवितांतून समाजातील वास्तव परिस्थितीची जाणीव करून दिली.
प्रारंभी ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोथापल्ली, सिनेअभिनेते विक्रम गोखले, लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण, प्रबोधिनीचे सदस्य चिमणराव जाधव, दौलतराव राणे आदींच्या निधनाबाबत श्रद्धांजली वाहण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते प्रबोधिनीतर्फे घेण्यात आलेल्या हस्ताक्षर आणि मराठी व्याकरण स्पर्धेतील विद्यार्थ्यांना रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन शीतल बडमंजी यांनी केले तर इंद्रजीत मोरे यांनी आभार मानले. यावेळी पालक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षणप्रेमी, रसिक उपस्थित होते.