पणजी / प्रतिनिधी
आम आदमी पार्टीचे गोवा अध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी बुधवारी चिंबल-रायबंदर जंक्शन येथे झालेल्या दुर्दैवी अपघातात सदस्य गमावलेल्या कारापूरकर कुटुंबाला आपला पाठिंबा व्यक्त केला.
बुधवारी रात्री रस्ता ओलांडत असताना एका भरधाव ट्रकने धडक दिल्याने 72 वषीय व्यंकटेश कारापूरकर
यांचा मृत्यू झाला. या दुःखद घटनेनंतर व्यंकटेश कारापूरकर यांच्या मुलांनी जंक्शनवर स्पीड ब्रेकर बसेपर्यंत मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे.
या मुलांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी ॲड. अमित पालेकर गुरूवारी चिंबल-रायबंदर जंक्शन येथे उपस्थित होते. अयोग्य रस्ते, खराब सिग्नल आणि वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांचा अभाव यामुळे चिंबल-रायबंदर जंक्शन अपघातप्रवण क्षेत्र बनले आहे. मुख्य रस्त्याजवळ उड्डाणपूल व्हावा, अशी अनेक वर्षांपासून स्थानिकांची मागणी आहे. मात्र आतापर्यंत यासंबंधित काम सरकारने केलेले नाही, अशी प्रतिक्रिया पालेकर यांनी दिली.
“भाजप सरकारने 2014 मध्ये चिंबलवासीयांना अपूर्ण पुलाचे काम सहा महिन्यांत सुरू करू, असे आश्वासन दिले होते. मात्र तेव्हापासून आतापर्यंत काहीच निष्पन्न झाले नाही. जर सरकार एका दिवसात हेलिपॅड बांधू शकते, तर आज स्पीड ब्रेकर बसवण्यासाठी विलंब का करत आहे?”, असे पालेकर म्हणाले.
ॲड अमित पालेकर यांच्या पाठपुराव्यामुळे काही महिन्यांपूर्वीच जंक्शनवर सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली. आता कुटुंबीयांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिल्यानंतर साबांखाने गुरुवारी सायंकाळी स्पीड ब्रेकर बसवण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली. “प्रत्येकवेळी आवाज उठवल्यानंतर किंवा निषेध केल्यानंतरच सरकार काम हाती घेते ही वस्तुस्थिती दुर्दैवी आहे”, असे पालेकर म्हणाले. दरम्यान, अॅ[. पालेकर कुटुंबियांसमवेत शवागारात गेले होते आणि रंबलर टाकण्याचे काम सुरू झाल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांना मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्याची विनंती केली.