लेफ्टनंट जनरल कलिता यांचे तवांगसंदर्भात प्रतिपादन
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताच्या सैनिकांनी चीनकडून तवांगमध्ये करण्यात आलेल्या घुसखोरीचा प्रयत्न ठामपणे हाणून पाडला आहे, असे वक्तव्य देशाच्या पूर्व कमांडचे अधिकारी कमांडर इन चीफ (ईस्टर कमांड) लेफ्टनंट जनरल राणा प्रताप कलिता यांनी केले आहे. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि आपल्या सेनादलांच्या क्षमतेसंबंधी निश्चिंत असावे, अशीही सूचना त्यांनी त्यांच्या वक्तव्यात केली आहे. ते शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलत होते. ‘विजय दिवसा’निमित्त आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
चीनच्या सैनिकांनी भारतात घुसण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तवांग येथील संवेदनशील भागात भारतीय सेनेने त्यांना पूर्णतः रोखले. त्यांना एक इंचभरही भारताच्या आत येऊ दिले गेले नाही. सर्व चीनी सैनिकांना पिटाळण्यात आपले सैनिक यशस्वी ठरले. हा संघर्ष स्थानिक पातळीवरच सोडविला गेला याचे समाधान जास्त आहे. भारताच्या भूमीचे डोळय़ात तेल घालून संरक्षण करतानाच संघर्ष चिघळू दिला गेला नाही, ही बाबही कौतुकास्पद आहे. स्थानिक पातळीवरील कमांडर्सनी चीनशी त्वरित संपर्क साधून त्यांना माघार घ्यायला लावली. भारताची सीमारेषा पूर्णतः सुरक्षित आहे, असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले.
सीमेसंबंधीचा वाद
भारत आणि चीन यांच्यात साडेतीन हजार किलोमीटर लांबीची सीमारेषा आहे. या सीमेवर अशी अनेक स्थाने आहेत, की जिथे चीनची सीमा कोणती आणि भारताची कोणती, हे नेमके स्पष्ट होत नाही. अशी किमान 10 ते 12 स्थाने आहेत की ज्यांचे नेहमी अतिशय सजगतेने संरक्षण करावे लागते. अशा जागा हेरून चीन काहीवेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतो. पण त्यांना वेळोवेळी रोखले जाते. चीनचा प्रतिकार अतिशय निर्धाराने आणि शूरत्वाने करण्यात येत आहे. भारताच्या उत्तर सीमेवरील सर्व स्थाने सुरक्षित असून परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात आहे, असे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल कलिता यांनी बोलताना केले.
राजनाथ सिंग यांना दुजोरा
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभेत तवांग येथील परिस्थितीसंबंधी निवेदन दिले होते. त्याला कलिता यांनी पूर्णतः दुजोरा दिला. काही लोक सीमेवरील स्थितीसंबंधी विनाकारण अफवा पसरवित आहेत. त्यांना देशाच्या सुरक्षेशी काहीही देणे-घेणे नाही. त्यांच्यावर मुळीच विश्वास ठेवण्याचे कारण नाही. कोणतीही परिस्थिती निर्माण झाली तरीही सैनिक समर्थपणे ती हाताळू शकतात, असे उद्गार काढताना त्यांनी सैनिकांची प्रशंसा केली आहे.
शिखर घेण्याचा प्रयत्न
तवांग परिसरातील सामरिकदृष्टय़ा महत्वाचे असे 17,000 फूट उंचीवरील शिखर बळकाविण्याचा चीनचा प्रयत्न होता. असा प्रयत्न त्याने यापूर्वीही अनेकदा केला आहे. 1962 च्या युद्धापासून हा चीनचा प्रयत्न सुरु आहे. गेल्या एप्रिलमध्येही तो करण्यात आला होता. तथापि, प्रत्येकवेळी चीनला कडवा प्रतिकार करण्यात आला असून आजपर्यंत हे शिखर मुक्तच राहिले आहे. हे शिखर यांगत्से किंवा ‘मागो चुना’ असे म्हणतात, अशी माहितीही त्यांनी दिली.
संसदेत पुन्हा गदारोळ
तवांग प्रकरणावरून शुक्रवारी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये पुन्हा विरोधकांनी गोंधळ घातला. आम्हाला बोलण्याची संधीच देण्यात आली नाही, असा आरोप काँगेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या मुद्दय़ावर सविस्तर निवेदन करतील आणि परिस्थिती अधिकृतरित्या स्पष्ट करतील अशी अपेक्षा होती. तथापि, ही अपेक्षा फोल ठरली आहे, असे प्रतिपादन खर्गे यांनी केले. लोकसभेत काँगेस खासदार मनिष तिवारी यांनी तवांगवर चर्चा व्हावी अशी मागणी केली. देशाच्या जनतेला चीन सीमेवर काय चालले आहे हे जाणून घेण्याचा अधिकार आहे. मात्र, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी यासंबंधी विस्तृत निवेदन केलेले नाही, असा आरोप त्यांनी केला.