वृत्तसंस्था /कोलंबो
श्रीलंकेत सुरू असलेल्या राजकीय-आर्थिक उलथापालथीदरम्यान चीनचे हेरगिरी जहाज युआन वांग 5 हंबनटोटा बंदरावर पोहोचणार आहे. चीनच्या या पावलानंतर भारत आता पूर्णपणे सतर्क झाला आहे. चीन स्वतःचे हेरगिरी जहाज पाठवून श्रीलंकेतील अस्थिरतेचा लाभ घेण्याच्या प्रयत्नात आहे.
चीनचे हेरगिरी करणारे हे जहाज 11 ऑगस्ट रोजी हंबनटोटा बंदरावर पोहोचणार आहे. हिंदी महासागर क्षेत्रात संशोधनकार्य तसेच उपग्रहीय नियंत्रण करणे हा याचा उद्देश आहे. प्रस्तावित दौऱयानुसार हे जहाज 17 ऑगस्ट रोजी हंबनटोटा येथून परतणार आहे. या हेरगिरी जहाजाच्या प्रस्तावित दौऱयात श्रीलंकेकडून कुठल्या प्रकारची मदत केली जात आहे हे भारत तपासून पाहत आहे.
हे चिनी जहाज हिंदी महासागराच्या पश्चिमोत्तर हिस्स्यात उपग्रह नियंत्रण आणि संशोधन देखरेख करणार असल्याचा दावा श्रीलंकेतील चीनच्या बेल्ट अँड रोड प्रकल्पाचे संचालक वाय. रानाराजा यांनी म्हटले आहे. युआन वांग 5 हे स्पेस ट्रकिंग जहाज असून विशेषकरून झोंगक्विंग-2ई उपग्रहाला त्याची कक्षा निर्धारित करण्यासाठी डाटा सपोर्ट करत आहे. हे जहाज सध्या तैवानजवळून प्रवास करत असल्याचे रानाराजा यांनी सांगितले आहे. तर चिनी जहाज किनारी भागांमध्ये हेरगिरी करण्याची क्षमता बाळगून असल्याचे तज्ञांचे सांगणे आहे.
2014 नंतर पहिल्यांदाच अशाप्रकारचे चिनी हेरगिरी जहाज श्रीलंकेच्या दौऱयावर येत आहे. यापूर्वी 2014 मध्ये एक चिनी पाणबुडी हंबनटोटा बंदरावर पोहोचली होती. याप्रकरणी भारताने तीव्र आक्षेप नोंदविला होता.