40 फूट उंच वीणा स्थापन ः लतादीदींच्या सुरांनी जगाला जोडल्याचे पंतप्रधानांचे उद्गार
वृत्तसंस्था / अयोध्या
उत्तरप्रदेशच्या अयोध्येत शरयू नदीच्या काठावरील नयाघाट चौक आता लता मंगेशकर चौक या नावाने ओळखला जाणार आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावावर निर्माण स्मृती चौकाचे लोकार्पण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी केले आहे. यावेळी केंद्रीय संस्कृतीमंत्री जी. किशन रेड्डी यांच्यासह लता मंगेशकर यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
भारतरत्न लता मंगेशकर यांची बुधवारी 93 वी जयंती होती. लोकार्पणापूर्वी लतादीदींना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर लतादीदींच्या कुटुंबातील सदसय आदिनाथ आणि कृष्णा मंगेशकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. तर लतादीदींनी गायिलेल्या भजनांचे सादरीकरण प्रसिद्ध गायिका सावनी रविंद्र यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या लोकार्पण सोहळय़ाप्रसंगी व्हिडिओ संदेश प्रसारित केला. लतादीदी या सरस्वती देवीच्या साधिका होत्या. त्यांच्या सुरांनी जगाला जोडले आहे. राम मंदिराच्या उभारणीस शुभारंभ झाल्याने लतादीदींना मोठा आनंद झाला होता, लतादीदींच्या अनेक आठवणी आमच्यासोबत जोडलेल्या आहेत, असे पंतप्रधानांनी यात नमूद केले आहे. 5 ऑगस्ट 2020 रोजी अयोध्येत भगवान रामाच्या मंदिराच्या उभारणीसाठी भूमिपूजन पार पडले होते. त्यादिवशी लतादीदींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून राम मंदिराच्या भूमिपूजनावरून स्वतःचा आनंद व्यक्त केला होता.
लतादीदींनी स्वतःच्या सुरांनी लोकांच्या मनाला जोडले आहे. लतादीदींच्या नावावर निर्माण करण्यात आलेला हा चौक आमच्या देशात कलाजगताशी संबंधित लोकांसाठी प्रेरणास्थळ ठरणार आहे. भारताच्या मूळांशी जोडून राहत आधुनिकतेच्या दिशेने वाटचाल करत भारताच्या कला आणि संस्कृतीला जगाच्या कानाकोपऱयात पोहोचविणे हे देखील आमचे कर्तव्य असल्याचे हा चौक सांगणार आहे. देशाच्या हजारो वर्षे जुन्या वारशावर गर्व करत भारताच्या संस्कृतीला नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे देखील आमचे कर्तव्य असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
कणा-कणात सामावलेत राम
प्रभू श्रीराम हे आमच्या संस्कृतीचे प्रतीक महापुरुष आहेत. राम आमच्या नैतिकतेचे जिवंत आदर्श आहेत. आमची मूल्ये, मर्यादा आणि कर्तव्याचे उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अयोध्येपासून रामेश्वरमपर्यंत राम देशाच्या कणा-कणात सामावलेले आहेत असे उद्गार मोदींनी काढले आहेत.
लतादीदींच्या नावावर विद्यापीठ
लतादीदींच्या दिवसाची सुरुवात भगवान रामाच्या पूजेने व्हायची. त्यांच्या नावावर चौक निर्माण होणे मोठी घटना आहे. अयोध्या आता विशाल रुप धारण करत असून पर्यटन आणि अध्यात्मिक विकासाचे हे केंद्र ठरणार असल्याचे मुख्यमंत्री योगी म्हणाले. 5 वर्षांमध्ये उत्तरप्रदेश पर्यटनाच्या क्षेत्रात नवी उंची गाठणार असल्याचे उद्गार केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी काढले आहेत. अयोध्येत लतादीदींच्या जीवनावर आधारित प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे.