पंतप्रधान मोदींचे उद्गार ः तिसऱया वंदे भारत एक्स्प्रेसला दाखविला हिरवा झेंडा
वृत्तसंस्था / अहमदाबाद
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरात दौऱयाच्या दुसऱया दिवशी म्हणजेच शुक्रवारी गांधीनगर रेल्वेस्थानकावर गांधीनगर-मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले आहे. ही देशाची तिसरी वंदे भारत एक्स्प्रेस आहे. पंतप्रधानांनी गांधीनगर ते कालूपूरपर्यंत नव्या रेल्वेतून प्रवास देखील केला. सोबत प्रवास करणाऱया कर्मचारी, उद्योजिका आणि अनेक तरुण-तरुणींशी पंतप्रधानांनी संवाद साधला आहे. 21 व्या शतकात भारताला शहरांमुळेच नवी गती प्राप्त होणार आहे. बदलत्या काळात बदलत जाणाऱया गरजांसोबत शहरांना देखील निरंतर आधुनिक करणे आवश्यक असल्याचे मोदी म्हणाले.
वंदे भारत आणि मेट्रोसेवेच्या शुभारंभानंतर पंतप्रधानांनी उपस्थित राहिलेल्या मोठय़ा जनसमुदायाचे कौतुक केले आहे. सध्या नवरात्रोत्सव असून गुजरातमध्ये रात्रभर गरबा खेळला जातो. तरीही मोठय़ा संख्येत लोक मेट्रोसेवेच्या शुभारंभ सोहळय़ाला उपस्थित राहिले. एवढा मोठा जनसागर मी अहमदाबादमध्ये पहिल्यांदाच पाहिला आहे. याचा अर्थ अहमदाबादचे लोक मेट्रोचे महत्त्व चांगल्याप्रकारे ओळखून आहेत. मेट्रोमुळे अहमदाबादवासीयांच्या अनेक समस्या संपणार असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
मल्टी ट्रान्सपोर्टेशनचे स्वप्न
हा प्रवास केवळ अहमदाबादपुरती मर्यादित राहणार नाही. 21 व्या शतकात भारताच्या सर्व शहरांना नवा वेग मिळणार आहे. बदलता काळ आणि गरजांसोबत शहरांना आधुनिक करणे आवश्यक आहे. गुजरातमध्ये मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना आम्ही मल्टी ट्रान्सपोर्टेशनवरून एक मोठी परिषद आयोजित केली होती, तेव्हा केंद्रात दुसरे सरकार असल्याने त्यावेळी स्वप्न पूर्ण करता आले नव्हते. जनतेने मला दिल्लीत पाठविल्यावर मी त्यांचे हे स्वप्न पूर्ण केल्याचे मोदी म्हणाले.
वंदे भारतमधून प्रवास
वंदे भारत एक्स्प्रेसच्या वेगवान प्रवासाचा आज अनुभव घेता. हा प्रवास काही मिनिटांचा होता, परंतु माझ्यासाठी हे गर्वाचे क्षण होते. ही गुजरातची पहिली वंदे भारत एक्स्प्रेस आहे. हवाईप्रवास करताना मोठा आवाज ऐकू येत असतो. परंतु वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करताना हा आवाज शंभरपटींनी कमी असल्याचा दावा मोदींनी केला आहे.
रेल्वेत अधिकाधिक गुंतवणूक
मागील 8 वर्षांमध्ये सर्वाधिक गुंतवणूक रेल्वेमध्ये करण्यात येत आहे. या वर्षांमध्ये देशातील 24 पेक्षा अधिक शहरांमध्ये मेट्रोचे काम पूर्ण झाले आहे किंवा सुरू आहे. पूर्वी आमच्या रेल्वेस्थानकांची स्थिती काय असायची हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु आता गांधीनगर रेल्वेस्थानक जगातील कुठल्याही विमानतळापेक्षा कमी सुंदर नाही. अन्य रेल्वेस्थानकांना आधुनिक रुप देण्याच्या योजनेला मंजुरी मिळाली असून यावर वेगाने काम सुरू आहे. जलद वाहतूकच आगामी काळात भारताचा विकास निश्चित करणार असल्याने आम्ही रेल्वेवर लक्ष केंद्रीत केले असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
रुग्णवाहिकेसाठी रोखला ताफा गुजरातमध्ये रुग्णवाहिकेला मार्ग देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा अहमदाबादहून गांधीनगर जात असताना रोखण्यात आला. मागून येणाऱया एका रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करून देण्यासाठी पंतप्रधानांच्या ताफ्यातील वाहने थांबली होती. रुग्णवाहिका पुढे निघून गेल्यावरच पंतप्रधानांचा ताफा रवाना झाला आहे.