पाणी, रस्ता, पथदीप आदी सुविधा पुरविण्याची मागणी
वार्ताहर /किणये
संतिबस्तवाड गावातील वॉर्ड क्र. 5 लक्ष्मीनगरातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. या वॉर्डामध्ये पिण्याचे पाणी नाही, रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. पथदीप बंद अवस्थेत आहेत. ग्रामपंचायतीचे याकडे साफ दुर्लक्ष झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी सोमवारी ग्रा.पं.वर मोर्चा काढून मूलभूत सुविधा पुरविण्याची मागणी केली.
संतिबस्तवाड वॉर्ड क्र. 5 मध्ये सध्या पिण्याचे पाणीच नाही. यामुळे पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. या वॉर्डमध्ये गेल्या महिनाभरापासून नळांना पिण्याचे पाणी आले नाही. आम्ही पाणी कोठून आणायचे, असा सवाल महिलांनी ग्रामपंचायतीला विचारला. सध्या केवळ वापरण्यासाठी तेवढेच पाणी येत आहे. या नगरात एकही कूपनलिका नाही. लक्ष्मी नगरातील रस्त्याकडे ग्रा.पं.चे दुर्लक्ष झाले आहे. रस्त्यावर चिखल पसरला आहे. यामुळे विद्यार्थी व नागरिकांचे हाल होत आहेत. काही पथदीप बंद अवस्थेत असल्यामुळे रात्रीच्या वेळी अंधाराचा सामना करावा लागत आहे.
ग्रामपंचायतीचे व सदस्यांचे दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिकांनी थेट ग्रा.पं.वर मोर्चा काढला. यावेळी अध्यक्षांना चांगलेच धारेवर धरले. ग्रा.पं. अध्यक्ष विठ्ठल अंकलगी यांनी निवेदन स्वीकारून सध्या या गल्लीतील कच्चा रस्ता करून ये-जा करण्यासाठी व्यवस्था करून देऊ, तसेच पिण्याच्या पाण्याचीही सोय करू, असे आश्वासन दिले. आम्हाला ताबडतोब सुविधा पुरवा. अन्यथा पुन्हा मोठय़ा प्रमाणात मोर्चा काढू, असा इशाराही गल्लीतील नागरिकांनी दिला आहे.
सदर निवेदनावर सचिन कब्बूर, दिगंबर कर्लेकर, भरमा दावतार, रेणूका सुणगार, सुनीता कर्लेकर, विद्या गुरव, सुरेखा होनगेकर, सुधा सावगावकर, शांता चौगुले, सातुली गुंडोजी, परशराम सुतार, महादेव चौगुले, यल्लाप्पा गुंडोजी, लक्ष्मण कदम, परशराम अनगोळकर आदींसह गल्लीतील नागरिकांच्या सह्या आहेत.