कार्यक्षम अधिकाऱ्यांच्या नेमणुकीची मागणी : अन्यथा टाळे ठोकण्याचा इशारा : विकासकामांकडे दुर्लक्ष झाल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी
वार्ताहर /किणये
गेल्या तीन वर्षांपूर्वी पिरनवाडी ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळूनही गावात म्हणावी तशी विविध विकासकामे झाली नाहीत, अशा तक्रारी नागरिकांमधून होत आहेत. नगरपंचायतीमधील नोडल अधिकाऱ्यांचे या विकास कामांकडे दुर्लक्ष झाले आहे. नोडल अधिकाऱ्यांच्या विरोधात तसेच गावात विविध विकासकामे राबविण्यासाठी या नगरपंचायतीवर कार्यक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी. यासाठी पिरनवाडीतील नागरिकांनी बुधवारी सकाळी नगरपंचायतीवर धडक मोर्चा काढला.
तालुक्मयातील बऱ्याच ग्रामपंचायतींमध्ये पीडीओ उपस्थित नसतात. काही ठिकाणी तर दोन ग्रामपंचायतींना मिळून एका पीडीओची नेमणूक करण्यात आलेली आहे. अशी परिस्थिती असताना पिरनवाडी नगरपंचायतीच्या नोडल अधिकारी पदासाठी एकाच दिवशी दोन अधिकारी आले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
गेल्या नऊ महिन्यांपासून पिरनवाडी नगरपंचायतमध्ये नोडल अधिकारी म्हणून हणमंतप्पा मानवड्डर हे कार्यरत होते. मात्र त्यांची सध्या बदली झालेली आहे. त्यांची बदली होऊ नये, आपण स्टे ऑर्डर घेऊन पुन्हा या नगरपंचायतीमध्ये आलो आहे, असे ते गेल्या दोन दिवसांपूर्वी सांगत होते, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. तसेच त्यांची नगरपंचायतीमध्ये नोडल अधिकारी म्हणून पुन्हा नियुक्ती करू नये व या नगरपंचायतीमध्ये काम करणाऱ्या कार्यक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
तीन गावांचा समावेश,सुविधांकडे दुर्लक्ष
पिरनवाडी गावातील रस्ते, गटारी, पथदीप आदी नागरी सुविधांकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत आहेत. या नगरपंचायतीमध्ये पिरनवाडी, खादरवाडी व हुंचेनहट्टी या तीन गावांचा समावेश आहे. पिरनवाडी गावचा विस्तार वाढला आहे. मात्र गावात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे निदर्शनास येतात. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नगर पंचायतीकडून म्हणावे तसे प्रयत्न करण्यात येत नाहीत, असेही यावेळी नागरिकांनी सांगितले. सध्या जोरदार पाऊस सुरू आहे पिरनवाडीच्या सिद्धेश्वर गल्ली, माऊती गल्ली, पाटील गल्ली आदी गल्यांमधील नागरिकांच्या घरात पाणी शिरलेले आहे. याकडेही नगरपंचायतीचे दुर्लक्ष झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही, अशी माहिती महिलांनी दिली.
नगरपंचायतीचे रूपांतर ग्रामपंचायतमध्ये करण्याची मागणी
नागरिकांकडून भरमसाठ कर वसूल करण्यात येत आहे. तसेच संगणक उताऱ्यासाठी अधिक पैशांची मागणी करण्यात येत आहे. अशा अनेक तक्रारी मोर्चा घेऊन आलेल्या नागरिकांनी मांडल्या. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे आहेत. या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. काही जणांच्या घरात पावसाचे पाणी जात असल्यामुळे अनेकांचे जगणे मुश्किल झाले आहे. तरीही नगरपंचायतीचे अधिकारी याची पाहणी करत नाहीत. मग आपण दाद मागायची कुणाकडे? असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. नगरपंचायतीचा दर्जा हा विकास कामांसाठी मिळालेला आहे. मात्र गावच्या विकासाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत.
जर नगरपंचायत होऊनही आम्हाला मूलभूत सुविधा मिळत नसतील तर पुन्हा नगरपंचायतीचे रूपांतर ग्रा. पं.मध्ये करावे, अशी मागणीही करण्यात आली. पिरनवाडी ग्रामपंचायतला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला असला तरी या गावचा विकास खुंटला आहे. या नगरपंचायतीच्या कारभाराला वैतागून अखेर संतप्त ग्रामस्थांनी बुधवारी सकाळी नगरपंचायतीवर धडक मोर्चा काढला व आम्हाला सक्षम अधिकारी हवा, अशी मागणी केली. अन्यथा या नगरपंचायतीला टाळे ठोकणार, असा इशारा देण्यात आला. यावेळी वडगाव ग्रामीण पोलीस स्थानकाचे पीएसआय लक्कापा व त्यांचे सहकारी दाखल झाले. त्यांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले. पिरनवाडी गावातील ज्योतिबा लोहार, अनिल भोईटे, सचिन गोरले, सतिश पाटील, शिवाजी शहापूरकर, पिराजी सुळगेकर, केशव पोळ, मल्लाप्पा पाटील, विठ्ठल यळ्ळूरकर, देवेंद्र पाटील, महेश पाटील, आप्पाण्णा पाटील, प्रमोद मुचंडीकर, नारायण मुचंडीकर, मजर मुल्ला आदींसह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तोडगा काढण्याचे वरिष्ठांचे आश्वासन
जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातून प्रोजेक्ट डायरेक्टर मल्लिकार्जुन कलादगी हे नगरपंचायतीकडे त्वरित हजर झाले. त्यांनी उपस्थित नागरिकांची मागणी व तक्रार ऐकून घेतली आणि आपण वरिष्ठांशी या संबंधात सांगून यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.