प्रतिनिधी /पणजी
राजधानी पणजीतील मिरामार समुद्रकिनारी ‘क्लिन-ए-थॉन’ हा सफाई उपक्रम राबवण्यात आला आणि किनाऱयांची सफाई करण्यात आली. गोव्यात येणाऱया पर्यटकांनी किनारे स्वच्छ ठेवावेत. तेथे किंवा नदीत केर, कचरा टाकू नये असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. पर्यटकात त्यासाठी जागृती होणे महत्त्वाचे आहे. असेही ते म्हणाले. आपले शरीर, घर आपण नियमितपणे साफ करतो तशी निसर्गाची, धरणी मातेची सफाई करा असा कानमंत्र अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी दिला. स्वच्छ गोवा भारत देशाची पर्यटन राजधानी बनेल असा विश्वास अमृता फडणवीस यांनी प्रकट केला.
पर्यटन खाते-गोवा सरकार, दिव्याज फाऊंडेशन, भामला फाऊंडेशन, एनएफडीसी यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव समारोपाच्यानिमित्ताने हा क्लिन-ए-थॉन जागृती उपक्रम आखण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सावंत उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत पण गोव्यात येणाऱया पर्यटकांनी देखील ते स्वच्छ रहावेत म्हणून योगदान द्यावे, त्यांनी किनारे घाण करू नये. तसेच सांडपाणी नदीत सोडू नये त्यामुळे प्रदुषण होते. सांडपाणी निचरासाठी किनारी गावात प्रकल्प सकारण्यात येत आहेत ते काम पंचायती करणार असल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली.
पर्यटनमंत्री रोहन खंवटे महसुलमंत्री बाबुश मोन्सरात, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, हेमा सरदेसाई, रेमो डिसोझा, अमृता फडणवीस अशी मान्यवर मंडळी त्यावेळी व्यासपीठावर उपस्थित होती. हेमा आणि अमृता यांनी ठेक धरून एक हिंदी गीतही म्हटले. या जागृती उपक्रमास चित्रपट महोत्सवाचे प्रतिनिधी व गोव्याचे नगरीक मोठय़ासंख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी गोवा राज्य स्वच्छ, सुंदर ठेवण्याचे आवाहन पेले. कार्यक्रमानंतर दिव्याज-भामला फाऊंडेशन, पर्यटन खाते व इतरांतर्फे मिरामार किनाऱयाची स्वच्छता हाती घेण्यात आली. सकाळी हा कार्यक्रम झाल्यानंतर दुपारपर्यंत स्वच्छता चालू होती.
मिरामार येथील ‘क्लिन-ए-थॉन’ या उपक्रमासाठी शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सकाळी लवकर पाचारण करण्यात आले होते. हे विद्यार्थी 300 च्या आसपास होते. ते साधारणपणे सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास शाळेत पोहोचतात पण हा उपक्रम सकाळी 7 वा. असल्याने त्यांना सकाळी 7 पुर्वीच मिरामार येथे आणण्यात आले. परंतु त्यांच्यासाठी खाण्या, पिण्याची कोणतीच सोय आयोजकांनी केली नाही. त्यांना उपाशिपोटी रहावे लागले तसेच किनारा साफ, सफाईचे काम करावे लागले. त्यांच्यासमवेत आलेल्या शिक्षकांनी या प्रकरणी तीव्र नाराजी खंत प्रकट केली. शिक्षण खात्याने यासंदर्भात दखल घेवून त्यांची यापुढे योग्य ती सोय करावी अशी मागणी होत आहे.