वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
आझमनगर, शाहूनगर ते कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. हद्दीपर्यंत रस्त्याकडेच्या तुंबलेल्या गटारी साफ करून सांडपाण्याचा निचरा करण्याची मागणी शाहूनगरवासियांतून करण्यात येत आहे.
महानगरपालिका, संबंधित अधिकारी व या भागाच्या नगरसेवकांनी याकडे त्वरित लक्ष देऊन गटारी साफ करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी करण्यात येत आहे.
गेल्या 20 ते 25 वर्षांपूर्वी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कंग्राळी बुद्रुक रस्त्याच्या दोन्ही बाजूने शाहूनगर वसाहतीची निर्मिती झाली आहे. नेहरूनगर, आझमनगर, वसाहतीमधील नागरिकांचे सांडपाणी शाहूनगर गटारीमार्गे कंग्राळी बुद्रुक रस्त्याच्या कच्च्या गटारीतून मुख्य नाल्यातून मार्कंडेय नदीला मिळते. यामुळे बेळगाव शहर-उपनगरांचे सांडपाणी शाहूनगरमार्गे जात असते.
नागरिकांनी प्लास्टिक कचरा गटारीत टाकू नये
आझमनगर ते शाहूनगर महानगरपालिका हद्दीपर्यंत वसाहतींचे सांडपाणी जाणाऱया गटारीमध्ये नागरिक प्लास्टिक व केरकचरा टाकून गटारी भरण्याचे काम करत आहेत. मनपानेसुद्धा वरचेवर गटारी साफ करून सांडपाण्याला वाट करून देण्याचे काम करणे गरजेचे आहे. परंतु महानगरपालिकेकडून वरचेवर गटारी साफ होत नसल्यामुळेच गटारी तुंबून सांडपाणी रस्त्यावरून वाहत असते. यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढत आहे. याला महानगरपालिका जबाबदार असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.
अरुंद गटारींमुळे सांडपाणी रस्त्यावर
वास्तविक पाहता नेहरूनगर, आझमनगर या उपनगरांचेही सांडपाणी शाहूनगरमार्गेच येत असते. तेव्हा महानगरपालिकेने शाहूनगर येथील गटारांची रुंदी वाढविणे गरजेचे आहे. गटारींची रुंदी कमी असल्याने गटारी तुंबून पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्यामुळे सांडपाण्याबरोबर पावसाचे पाणीही रस्त्यावरून वाहत आहे.
तेव्हा महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱयांनी इकडे त्वरित लक्ष देऊन गटारींची स्वच्छता करून सांडपाणी व्यवस्थित वाहण्याची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात येत आहे.