प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्टसिटी योजनेअंतर्गत शहर आणि उपनगरात स्मार्ट बसथांबे निर्माण करण्यात आले आहेत. मात्र बसथांब्यांची देखभाल करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. बसथांबे हस्तांतराच्या वादामुळे स्वच्छतेकडे कानाडोळा झाला होता. पण शहरवासियांच्या सुविधेसाठी महापालिकेनेच आता स्मार्ट बसथांब्यांच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे.
शहर आणि उपनगरातील बसथांब्यावर भटकी जनावरे आणि काही ठिकाणी निराधार व्यक्ती ठाण मांडत आहेत. तर काही ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कोटीचा निधी खर्चून उभारण्यात आलेल्या बसथांब्यांच्या देखभालीकडे स्मार्टसिटी आणि महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. पण अलिकडेच महापालिकेने शहरातील 39 बसथांब्यांवर जाहिरात फलक लावण्यासाठी लिलाव प्रक्रिया आयोजित केली होती. दोन वेळा लिलाव राबवूनही प्रतिसाद मिळाला नाही. याठिकाणी घाण साचली असून दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्मार्ट बसथांब्यांच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. याची सुरुवात जिल्हाधिकारी आणि न्यायालयासमोर असलेल्या बसथांब्याच्या स्वच्छतेपासून करण्यात आली. दररोज दोन ते चार बसथांब्यांची स्वच्छता करण्याची सूचना स्वच्छता निरीक्षकांवर सोपविली असल्याची माहिती पर्यावरण सहाय्यक कार्यकारी अभियंते एच. व्ही. कलादगी यांनी दिली. बसथांबे उभारण्यात आले पण आतापर्यंत स्वच्छता केली नसल्याने छतावर घाण साचली आहे. त्यामुळे स्वच्छ करून चकाचक करण्याची सूचना स्वच्छता अधिकाऱयांना केली आहे.