पंढरपूर : आषाढी वारीनिमित्त पर्यावरणाच्या रक्षणासाठी ‘पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी’ हा उपक्रम चालवण्यात आला होता. या उपक्रमाचा समारोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज झाला. (Closing of ‘paryavrnachi Wari-Pandharichya dari’ in the presence of Chief Minister Shind) यावेळी प्रदूषणकारी प्लास्टिकचा वापर टाळू आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करू, असे आवाहन शिंदे यांनी केले.
पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात या उपक्रमाचा समारोप झाला. यावेळी ते बोलत होते.
शिंदे म्हणाले, एकदा वापर करुन फेकून देण्यात येणाऱ्या प्लास्टिकमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्यामुळे १ जुलै २०२२ पासून एकदा वापरण्यात आलेल्या प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. ज्ञानोबा-तुकोबांसारख्या संतांनी पर्यावरणाचा संदेश आपल्या अभंग आणि भारूडामधून दिलेला आहे. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ असे संत तुकाराम महाराज म्हणतात, तर ‘नगरेची रचावी जलाशय निर्मावी महा वने लावावी नानाविध’ असे संत ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. आपल्याला पर्यावरण जनजागृतीची ऐतिहासिक परंपरा आहे. संतांचा हा संदेश लक्षात घेऊन प्रदूषण दूर करण्यासाठी प्रयत्न करावा, असेही शिंदे यांनी सांगितले.
हेही वाचा : राज्याचा सर्वांगीण विकास होऊ दे; मुख्यमंत्री शिंदेंचं विठूरायाला साकडं
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रा. तानाजी सावंत, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आदी उपस्थित होते.